ब्रह्मपुरी : स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत. अशाच प्रकारची एक समस्या गावाला कसे जायचे. गेले अनेक वर्षापासून तालुक्यातील पवनपार वासियांना हा प्रश्न सतावत होता. मात्र आता प्रत्यक्षात गावकऱ्यांची ही समस्या सुटली असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस पोहचल्याने गावकऱ्यांत आनंद पसरला आहे. नोव्हेंबर महिन्यात आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी सूत्रे स्वीकारताच त्यांनी रस्त्याची पाहणी करुन प्रत्यक्ष गावाला भेट दिली. तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून २९ किमीवर असलेले पवनपार हे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शिक्षण व आरोग्य या बाबतीत समाधानकारक स्थिती आहे. मात्र जाणे येणे करण्यासाठी वाहनांची सोय स्वातंत्र्यापासून नाही. नागरिकांच्या मागणीनुसार व पंचायत समिती सदस्य देवेंद्र मडावी यांनी मागणी रेटून धरल्याने आगार व्यवस्थापकाने या गावासाठी पहिल्यांदाच बससेवा सुरू केली. आगाराला सहकार्य करण्याचे आवाहन ब्रह्मपुरीचे आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पवनपार गावात पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस
By admin | Updated: March 23, 2015 01:09 IST