गजानन गावंडे यांचे प्रतिपादन : आंतरशालेय क्रीडा संमेलनाचे उद्घाटनचंद्रपूर : शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धादेखील महत्त्वाची आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भावी क्रीडापटूच्या पाऊलखुणा दिसून येतात. खेळ हा खिलाडू वृत्तीने खेळण्याची यातून प्रेरणा मिळते. सहजीवन यातून अनुभवा येते. क्रीडा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून क्रीडा स्पर्धेमुळे मन व शरीर सुदृढ बनते, असे प्रतिपादन चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी येथे केले.दी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संचालित न्यू इंग्लिश हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा व श्री बालाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बामणी (दुधोली) अंतर्गत स्थानिक न्यू इंग्लिश हास्यकूलच्या क्रीडांगणावर आंतर शालेय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन गावंडे बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन काँग्रेसचे राहुल पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दी एज्यूकेशन सोसायटीचे सचिव वसंत जवळे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, महानगरपालिकेच्या सदस्य सकीना अंसारी, मिना खनके, संजय महाडोळे, प्राचार्य श्रीधर फटाले, प्राचार्य आस्तिक उरकुडे, प्राचार्य अनिता पंधरे, संगीता वैद्य, मनोहर बनसुले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चांदा रायफल शुटींग क्लबचे आदेश चामलवार, निखील सरकार, अक्षय मोगरे यांनी रायफल शुटींगचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी रामभाऊ टोंगे म्हणाले, विद्यार्थ्यांना एखाद्या टप्प्यावर अपयश येणे साहिजक आहे. अशावेळी सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन वाटचाल करावी. यशाच्या प्रयत्नात चुका होणार नाही, याची काळजी घ्यावी. यातून इच्छित ध्येय गाठता येते, असे ते म्हणाले. राहुल पुगलिया यांनी रायफल शुटींगचे प्रात्यक्षिक व पतंग महोत्सवात उपस्थितीत राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून प्राचार्य श्रीधर फटाले यांनी क्रीडा संमेलनाची भूमिका विशद केली. संचालन संगीता वैद्य यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
क्रीडा स्पर्धेमुळे मन व शरीर सुदृढ बनते
By admin | Updated: February 1, 2017 00:38 IST