वरोरा : आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी शेताची मशागत करुन तयारी करीत आहेत. कृषी विभागही रब्बी व खरीप हंगामाकरिता सज्ज झाला आहे. यावर्षी कपाशी व तुरीच्या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढणार असून सोयाबीन पिकाच्या पेऱ्याची घट होणार असल्याचे मानले जात आहे. वरोरा तालुक्यात कापूस, सोयाबिन, तूर, भात ही मुख्य पिके मानली जातात. त्यातच सोयाबिन व कापूस या दोन रोखीच्या पिकांना शेतकरी प्राधान्य देत असतात. मागील वर्षी कापूस ३३ हजार हेक्टर, सोयाबिन २० हजार हेक्टर, तर तूर ६ हजार हेक्टर व भात १९०० हेक्टर मध्ये शेतकऱ्यांनी लागवड केली होती. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात वाढ होवून ३४ हजार २०० हेक्टर, सोयाबीनच्या पेऱ्यात मागील वर्षीच्या तुलनेत घट होऊन यावर्षी १८ हजार ७०० हेक्टर तर तुरीच्या पेऱ्यात वाढ होऊन ९ हजार ३५० हेक्टर मध्ये पेरणी करण्यात येणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मागील वर्षी सोयाबिन बियानाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक केली. उगवत क्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या मस्तकी मारले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनची होळी करावी लागली. काहींना अत्यल्प उत्पादन झाले. दरही घसरले, त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला होता. मागील हंगामाच्या सुरवातीला पावसाने उघड झाप सुरु ठेवल्याने कपाशीच्या बियाणाची एकदा नव्हे तर तीनदा लागवड करावी लागली. त्यानंतरही शासनाने हमी भाव ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल घोषित करुनही तो भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता नव्या जोमाने शेती करण्यासाठी लगबग सुरू करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)रासायनिक खतांची मागणी वाढलीमागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन व्हावे याकरिता रासायनिक खत व किटकनाशकाची फवारणी पिकावर करणे सुरु केले आहे. मागील वर्षी १२ हजार मेट्रिक खत रासायनिक खताची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षी १५ हजार ४० मेट्रिक टन रासायनिक खत लागणार आहे. यामध्ये युरिया खताला सर्वाधिक मागणी आहे.बियाण्यांकरिता कृषी विभाग सज्ज शेतकरी यावर्षी कापूस, तूर, भात व सोयाबीन या बियाणांची मागणी करणार असल्याने कृषी विभागाने आपले नियोजन बियाणांची मागणी करुन ठेवली आहे. बियाणांचा ऐन हंगामात काळाबाजार होणार नाही याकरिता कृषी विभागाने उपाय योजना राबविणे सुरु केले आहे. सोयाबीन १८ हजार ७०० क्विंटल बियाने, भात ७५० क्विंटल, तुरी २०० क्विंटल तर कापूस १ लाख ४५ हजार पाकिटे बियाणे लागणार आहे.कापूस व सोयाबीन पीक मागील कित्येक वर्षापासून शेतकरी घेत आहे. मागील वर्षी सोयाबीनचा मोडा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतात तुरीची पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी दोन बाय पाच आकारात टोवन पद्धतीने तुरी लावल्याने वातावरण चांगले नसूनही तुरी पिकावर रोग आला नाही उत्पादन चांगले झाले तर भावही प्रती क्विंटल सात हजार मिळाल्याने यावर्षी शेतकरी तूर पिकाची शेती मोठ्या प्रमाणात करतील, असा अंदाज आहे.- गजानन हटवार, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वरोरा
कापूस व तुरीचा पेरा वाढणार तर सोयाबीनचा घटणार
By admin | Updated: June 3, 2015 01:33 IST