राजुरा : राजुरा व विरूर रेंजमधील वन्यप्राण्यांपासून नागरिकांच्या जीविताचे, पशुधनाचे व उभ्या पिकांचे संरक्षण होण्याचे दृष्टीने संपूर्ण जोगापूर जंगलाच्या चारही बाजूंनी काटेरी तारेचे कुंपण करून त्यात सौर ऊर्जेचा प्रवाह सोडण्यात यावा. शेतकर्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी आणि मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी हे सौर कुंपण करण्याची मागणी शेतकरी ज्येष्ठ संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीसह शेतकर्यांचे पीक उद्ध्वस्त करीत असतात. अशा परिस्थितीत शेतकरी व जनतेचा वन्यप्राण्यांपासून बचाव व्हावा आणि वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी सौर ऊर्जा कुंपणाचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. जोगापूर जंगलाचे संपूर्ण भागाला कुंपण करून त्यात सौर ऊर्जेचा प्रवाह सोडल्यास वन्य प्राण्यांनी तारेच्या कुंपणाला स्पर्श केल्यास त्यांना सौम्य झटका बसतो. त्यामुळे वन्यप्राणी मरत नाही आणि ते आल्या पावली कुंपणाचे बाहेर जातात. त्यामुळे मानवी जीवित हानी आणि शेतपिकांची हानी होणार नाही.
व्यापक जनहित लक्षात घेता हे सौर कुंपण तात्काळ करावे, अशी मागणी राज्याचे वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव), प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य व उप वनसंरक्षक, चंद्रपूर यांच्याकडे शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप, शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, सिंधू बारसिंगे, चंद्रकला ढवस, अनंता येरणे, रमेश नळे, मधुकर चिंचोलकर, दिलीप देठे, डॉ.गंगाधर बोढे, जिवन आमने, आबाजी ढवस, कवडू पोटे,नारायण गड्डमवार, नरेंद्र काकडे, दिलीप देरकर,भाऊजी कन्नाके, हिंगाणे, पुंडलिक वाढई,मधुकर उरकुडे,भास्कर सिडाम, सरपंच भास्कर देवतळे, नंदू कुबडे, सुधाकर अमृतकर यांनी केली आहे.