विकास खोळंबला : ग्रामविकास अधिकाऱ्याविना ग्रामपंचायतनवरगाव : ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक हा त्या-त्या गावाचा विकासाचा कणा असतो. परंतु सिंदेवाही तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या नवरगाव ग्रामपंचायत कार्यालयात पाच वर्षात सहा ग्रामविकास अधिकारी बदलून गेल्याने विकास कामांना खिळ बसली असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.नवरगाव १५ हजार लोकसंख्येचे गाव असून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी १७ सदस्य असून २० कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्याचे पद आहे. आतापर्यंत प्रिती चिमूरकर, व्ही.एल. मेश्राम, प्रिती वी. कुंभरे, बी.सी. शंभरकर, किर्तीमंत मगर, ए.के. सुखदेवे अशा पद्धतीने विविध कारणाने मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सहा ग्रामविकास अधिकारी बदलून गेलेत. नुकतेच आलेले सुखदेवे हे अवघ्या एक महिन्याच्या कालावधीतच बदलून गेले. सध्या या ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी नसल्याने सदर पद रिक्त आहे.नागरिकांना विविध दाखल्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये यावे लागते. बऱ्याच दाखल्यावर ग्रामविकास अधिकाऱ्याचीच सही लागत असल्याने नागरिकांना ग्रामपंचायतीचे उंबरठे वारंवार झिजवावे लागत आहे. अलिकडे उन्हाळा असल्याने घरकूल शौचालयाचे बांधकाम जोमात सुरू आहेत. ते पूर्ण बांधून झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांचा पूर्ण बांधकाम झाल्याचा दाखला लागतो. परंतु सदर पद रिक्त असल्याने दाखला मिळणे कठीण झाले आहे. धुमनखेडा येथील भास्कर नन्नावरे यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र दाखल्याअभावी त्यांना बिल मिळणे कठीण झाले आहे.नवरगावातील विकासकामेही रखडलेली आहेत. पाच वर्षात सहा ग्रामविकास अधिकारी बदलत असतील तर त्या गावाचा विकास साधण्यासाठी विविध अडचणी निर्माण होत असल्याने नवरगावसाठी लवकर नवीन ग्राम विकास अधिकारी देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
नवरगाव ग्रामपंचायतीला पाच वर्षात सहा ग्रामविकास अधिकारी
By admin | Updated: May 18, 2016 00:53 IST