महिला दिन विशेष : कर्तृत्ववान महिलांची लोकमतशी बातचीत
आनंद भेंडे/ नितीन मुसळे
राजुरा - मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर अशी देणगी स्त्रीला असते. सामर्थ, श्रद्धा, शील, सहनशीलता, सेवा, मातृत्व हे सर्व गुण अंगी असणाऱ्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांची ओळख करून देण्यात लोकमत नेहमीच अग्रेसर आहे. मध्य चांदा वन विभागातील राजुरा व विरूर वन परिक्षेत्रात वर्षभर धुमाकूळ घालून दहा जणांचा बळी घेणाऱ्या आरटी-१ वाघाला पकडण्यात अशाच पाच वाघिणींचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
मध्य चांदा वन विभागातील राजुरा व विरूर वन परिक्षेत्रात नरभक्षी आरटी-१ वाघाने धुमाकूळ घातला होता. या नरभक्षी वाघाने १६ जानेवारी २०१९ ला पहिला बळी घेऊन वर्षभरात दहा निष्पाप नागरिकांचा बळी घेतला तर तीन नागरिकांना गंभीर जखमी केले तर शेकडो जनावरांवरही हल्ले केले होते. वाघाने तीन बळी घेतल्यानंतर परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधींकडून या वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली. वन विभागाने २५ नोव्हेंबर २०१९ ला या नरभक्षी वाघास जेरबंद करण्याचा आदेश काढला. त्या पद्धतीने कार्य सुरू झाले. मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, राजुरा उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या मार्गदर्शनात वन विभागाचे राजुरा, विरूर, कोठारी, बल्लारशा येथील कर्मचारी व व्याघ्र प्रकल्पाचे स्पेशल स्कॉड असे सुमारे १५० कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. यात राजुरा वन परिक्षेत्राअंतर्गत महिला कर्मचारी मुर्ती येथील वनरक्षक सीमा किरण तुराणकर, नलफडी येथील सुलभा प्रभाकर उरकुडे, टेंबुरवाही प्रियंका ज्ञानदेव जावळे, सुमठाना येथील मीरा राठोड, सिर्सी येथील वर्षा वाघ यांचाही सहभाग होता. या मोहिमेत वन विभागाच्या या पाच वाघिणींचे महत्वपूर्ण योगदान होते. नरभक्षी वाघास जेरबंद करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेअंतर्गत या पाचही महिला घनदाट जंगलात गस्त घालून वन विभागाच्या १३ बीटामध्ये ३५ ते ४० किलोमीटर परिसरात लावलेले २८ ठिकाणचे विविध ट्रॅप कॅमेरे सकाळी ८ आणि सायंकाळी ४ वाजेपर्यंत तपासत होत्या. जंगलात मचाण उभारून वाघाची दिशा सर्च करीत होत्या. वाघास जेरबंद करण्यास विविध प्रकारचे प्रयोग केले. कोरोनाच्या काळात सगळे कर्मचारी घरी बसले होते. परंतु या वाघाच्या दहशतीत वन विभाग मात्र काम करीत होता. या काळात दिवस रात्र कर्तव्य बजावीत असतांना मात्र परिवाराची चांगली साथ मिळाली. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमचे कार्य करू शकलो, असेही मत त्यांनी व्यक्त केले. या महिलांच्याच कार्यक्षेत्रात वन विभागाच्या सिंधी कक्ष क्र. १७९ मधील रेल्वेच्या गोमती पुलावर उभारलेल्या पिंजऱ्यात या आरटी-१ वाघाला २७ ऑक्टोबर २०२० रोजी जेरबंद करण्यात यश आले.
या वर्षभर चाललेल्या मोहिमेत कार्यरत पाचही महिला कर्मचाऱ्यांना शासनाकडून विशेष प्रोत्साहन देऊन सन्मानित करावे. महिला दिनानिमित्त हीच त्यांना अनमोल देणगी ठरेल.