चिमूर : देशात मागील तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे शेती विषयक कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी चिमूर तालुक्यातील राष्ट्र सेवादल व शिक्षक भारती संघटनेकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले.
केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तीनही शेती विषयक कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. या कायद्यांच्या विरोधात मागील तीन महिने दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध करीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतीविरोधी तीनही कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी चिमूर तालुक्यातील राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारती संघटनेचे वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले. या अभियानात शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, रविंद्र उरकुडे, रावन शेरकुरे, इम्रान कुरेशी, कैलाश बोरकर, मनोज राऊत आदी सहभागी झाले होते.