बल्लारपूर: येथील नगरपालिका व बसस्थानक परिसरात ट्राफीक सिग्नल लावावे, अशी मागणी आहे.
बल्लारपूरला औद्योगिक दृष्टीने जिल्ह्यात अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. सोबतच हे महाराष्ट्रातील शेवटचे सर्वात महत्त्वाचे शहर आहे. नगर परिषदसमोरील चौपदरी रस्ता हा आंध्र प्रदेशात जाणारा राष्ट्रीय मार्ग असून, या मार्गावर छोट्या व जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. येथील लोकसंख्या लाखाच्या घरात असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. बल्लारपूरची आणखी एक विशेषतः म्हणजे येथील नगर परिषद, सामान्य रुग्णालय, पोलीस स्थानक, तहसील कार्यालय, बसस्थानक, रेल्वे स्थानक हे मध्य भागी आहेत. त्यामुळे काटा गेट ते जुने बसस्थानकपर्यंत वाहनांची व लोकांची वर्दळ नेहमीच असते.
चौपदरीकरण करण्याअगोदर येथील नगरपरिषद समोरील व बसस्थानकसमोरील वर्दळ लक्षात घेता तेथे ट्राफीक सिग्नल लावण्यात आले होते. परंतु चौपदरीकरण कामाअंतर्गत ते काढण्यात आले. आज चौपदरीकरण होऊन साधारण ६- ७ वर्षे लोटली. परंतु ट्राफीक सिग्नल लावण्याचे काम आजही थंडबस्त्यात आहे. ट्राफीक सिग्नलअभावी या मार्गावरील राहदारी नेहमीच प्रभावित असते. त्यामुळे काही किरकोळ अपघातही झाले आहेत. या मार्गावर त्वरित ट्राफीक सिग्नल लावण्याची मागणी जनतेकडून होत आहे.