चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानही सातत्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ४० बॅग रक्तपुरवठा केला जात आहे. त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे भविष्यात रक्त तुटवडा होण्याची शक्यता आहे. सिकलसेल, थैलीसीमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेच आहे. रक्ताची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत रक्तसंकलन कमी प्रमाणात होत आहे. तसेच गत वर्षभरात कोरोनामुळे रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाची लस घेणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे सामाजिक संस्था, संघटनांद्वारे रक्तदान शिबिरांचेही आयोजन कमी झाले आहे. परिणामी मागणी जास्त आणि संकलन कमी, अशी काहीशी अवस्था आहे. सध्या कोरोना लसीकरण केले जात आहे. ज्यांनी लस घेतली त्यांना २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुडवडा भासण्याची शक्यता आहे. एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात रक्तपेढीला रक्त पुरवठा कमी होणार आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतून दररोज ३० ते ४० बॅग रक्तपुरवठा केला जात आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी तर रक्ताची मागणी वाढते, अशावेळी अडचण भासू नये यासाठी तरुणांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. विशेषत: कोरोना लस घेण्यापूर्वी प्रथम रक्तदान करून लस घेतल्यास भविष्यात रक्ताचा तुडवडा भासणार नाही.
--
युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे
रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४० ते ५० वर्षे वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. यातील काहींनी आता कोरोना लस घेतली आहे. त्यामुळे पुढील २८ दिवसांपर्यंत त्यांना रक्तदान करत येणार नाही. आता सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
शासकीय रक्तपेढीत मोजकाच साठा
येथील शासकीय रक्तपेढीत मोजकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. दररोज ३० ते ४० बॅगची मागणी असते. सद्यस्थितीत ए पाॅझिटिव्ह ६५, बी पाॅझिटिव्ह १००, ओ पाॅझिटिव्ह ९० तसेच अन्य गट रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा येत्या काही दिवसांपर्यंतचाच आहे.
बाॅक्स
सध्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तदात्यांची संख्या कमी होते आणि रक्ताची मागणी वाढते. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी या दिवसांत रक्तदान करून सहकार्य करणे गरजेचे आहे.
-डाॅ. अमित प्रेमचंद
ब्लड बँक अधिकारी, मेडिकल काॅलेज चंद्रपूर