दोनदा प्रथम पुरस्कार : प्रशासनाने प्रोत्साहन दिल्यास देशात ‘आदर्श गाव’राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्कमूल : केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी श्रमदान न करता गेल्या १७ वर्षांपासून अविरत श्रमदान करून गावातील जनतेला श्रमदानाचे महत्त्व सातत्याने मूल तालुक्यातील ‘राजगड’ या गावात बघायला मिळत आहे. २००० मध्ये सुरू झालेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत भाग घेऊन २००२-०३मध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस खेचृून आणून महाराष्ट्राच्या पटलावर आपली अमीट उमटवली होती. नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी येथील चंदू पाटील मारकवार यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या सहभागामुळे यावर्षीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ पुरस्काराचा पहिला क्रमांक पुनश्च: राजगडला मिळाला. राजगड गावाचे नियोजन भौगोलिक रचनेनुसार आहे. गावातील युवकांना रोजगार, सिंचनाची शेती व विविध उपक्रमातून गावाचा विकास साधण्याचा मानस असताना मात्र जिल्हा प्रशासन असो की, लोकप्रतिनिधी प्रोत्साहन देण्यास अपयशी ठरत आहे. गावाला प्रोत्साहित केल्यास ‘राजगड’ गाव देशात ‘आदर्श गाव’ म्हणून आपली अमीट छाप उमटविण्यात यश येईल, असा विश्वास चंदू पाटील मारकवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मूल तालुक्यातील ‘राजगड’ या गावाची लोकसंख्या १ हजार ५९६ असून ८०८ पुरुष व ७८० महिलांचा समावेश आहे. २००० मध्ये मारकवार यांनी गावातील युवकांना एकत्र करून नव्याने सुरू झालेली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ अभियानात उडी घेतली. त्यावेळी कुठलाही अनुभव नसताना गावासाठी श्रमदान करायचे, एवढाच उद्देश ठेऊन युवकांनी श्रमदानास सुरूवात केली. त्यानंतर श्रमदान केल्यास व अभियानात सहभाग घेतल्यास पुरस्कार मिळतो, असे कळल्यानंतर ग्रामस्थांनी अभियानात जीव ओतला. त्याचेच फलित म्हणजे २००२-०३ मध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. बक्षीस मिळाल्यानंतरही मारकवार यांनी गावाच्या विकासासाठी झटण्याचा प्रयत्न सातत्याने केला. गावातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी रोजगर निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाचा पाहिजे, त्या प्रमाणात सहभाग मिळाला नाही. दुग्ध व्यवसायासाठी शीतगृह असणे आवश्यक असताना तालुक्यात ही व्यवस्था नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळाले नाही. राजगड गावात शाश्वत विकास करण्याचा मानस असला तरी प्रोत्साहनाचा अभाव आहे. राज्यात प्रथम आलेले राजगड गाव ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघात असताना मात्र त्या गावाच्या विकासात्मक कार्यात प्रोत्साहनाची थाप पडावी, असे कधीही घडले नाही.२००२-०३ मध्ये राजगडला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळाल्यापासून पुरस्कारांची मालिका सुरूच आहे. २००६-०७ मध्ये निर्मलग्राम पुरस्कार, २०११ मध्ये पर्यावरणरत्न पुरस्कार, २०१५-१६ मध्ये दीनदयाल उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कार, तसेच २०१६-१७ मध्ये पुनश्च: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातत्याने पुरस्काराची व गाव विकासाची मालिका जपणाऱ्या ‘राजगड’ला प्रोत्साहनाची गरज आहे.राज्यात आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरवे बाजार असो की राळेगणसिध्दी असो. याच गावाच्या तोडीस तोड आदर्श गाव निर्माण करण्याचा आत्मविश्वास चंदू पाटील मारकवार व इतर ग्रामस्थांना आहे.
१७ वर्षांपासून राजगड येथे अविरत श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:35 IST