आर्थिक अडचण : बळीराजा झिजवतोयं सोसायटीचे उंबरठेशंकरपूर : येथे विविध कार्यकारी संस्था असून या संस्थेने आतापर्यंत कर्जाचे वाटप न केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. शेतीच्या मशागतीपासून ते बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु शंकरपूर येथील विविध कार्यकारी संस्थेने अद्यापपर्यंत कर्जवाटप न केल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दररोज सोसायटीच्या कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहे. कार्यालय बहुतांशी वेळा बंद राहत आहे, तर संबंधित लिपीक कार्यालयात चुकून सापडला तर दोन-तीन दिवसात कर्ज वाटप होईल, असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे. शासनाच्या धोरणानुसार संस्थेतून पहिल्या हफ्त्याचे वाटप १५ मेपर्यंत करणे गरजेचे आहे. परंतु जून महिन्या पंधरवडा संपला तरी कर्जाचे वाटप झाले नाही. या संस्थेत १२२ सभासद आहेत. या सभासदांना दोन कोटी २१ लाख दहा हजार रुपयांचे वाटप करावे लागते. या कर्जाच्या भरवशावरच शेतकरी बि-बियाणे घेत असतात. परंतु वाटपच न झाल्याने शेतकऱ्यांनी बि-बियाणे घेतले नाही. या क्षेत्रात मिरची, सोयाबीन, धान, कापूस ही पिके शेतकरी घेतात.या पिकाचे बि-बियाणे घेण्यासाठी कर्जवाटप होण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. शेती हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी बि-बियाण्यांची लागवड करीत आहे. परंतु या १२२ शेतकऱ्यांनी अजुनही बि-बियाणे खरेदी न केल्यामुळे लागवड झाली नाही. या संस्थेवर प्रशासक नेमल्यामुळे या सभासदांचा वाली कोणीच नाही. वरिष्ठ पातळीवर दखल घेवून शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. (वार्ताहर)
शंकरपूर सोसायटीकडून अजूनही कर्ज वाटप नाही
By admin | Updated: June 21, 2015 01:57 IST