फोटो : हिच ती भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत
मूल : शेती व प्लाॅट कामातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जनता भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात. जमिनी संबंधी क प्रत, नकाशा, आखीव पत्रिका व विविध दाखल्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात जनतेची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र विविध दाखल्यासाठी पावती भरल्यानंतर वेळेवर दिल्या जात नाही आणि एक महिन्यानंतर पावतीची मुदत संपलेली आहे, त्यामुळे दुसरी पावती भरा असा दम दिला जातो. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेती व प्लाॅट संबंधी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनता भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात. कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करीत अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. भूमी अभिलेख कार्यालयात क प्रत, आखीव पत्रिका, नकाशे व इतर कामासाठी पावती कपात केली जाते. नियमानुसार कागदपत्रे दोन ते तिन दिवसात द्यायला पाहिजे. मात्र ते देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. आडमार्गाने मात्र त्वरित देण्याचा घाट केला जात आहे. सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा सपाटा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे. शेती संबंधी दररोज शेकडो लोक येत असताना मात्र चिरीमिरी घेऊनच कामे केली जातात उर्वरित लोकांना मात्र या ना कारण पुढे करुन नंतर येण्याचा सल्ला दिला जातो.
बॉक्स
प्रभार सिंदेवाहीतील अधिकाऱ्यांकडे
येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांचा कार्यभार सिंदेवाही येथील उपअधीक्षकांकडे असल्याने ते आल्यावरच कागदपत्रासाठी लागणारी पावती कपात केली जाते. त्यानंतर इतर कामे होत असतात. त्यामुळे हे पद भरणे महत्त्वाचे झाले आहे. तशी मागणीही केली जात आहे.
कोट
जनतेची कामे जलद गतीने व्हावी हा आपला प्रयत्न आहे. क प्रत, आखीव पत्रिका, नकाशा व इतर कामासाठी पावती कपात केल्यानंतर काही दिवसातच पुन्हा दुसरी पावती कपात करण्याची सक्ती केली जाते, हे नियमानुसार नाही. याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येणार आहे.
-हरिदास नंन्नावरे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूल.