चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान लागु झालेल्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदलीप्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हास्तरावर १७ मे, २३ मे, तर तालुकास्तरावर २६ ते ३१ मे दरम्यान समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात येणार आहेत. समुपदेशन पद्धतीने करण्यात येणार्या बदली प्रक्रियेची सध्या मिनीमंत्रालयात तयारी सुरू आहे.जिल्हा परिषदेतील गट क आणि गट ड श्रेणीतील कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसदर्भात काही दिवसांपूर्वीच निर्णय धडकला. मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया रखडली होती. आता आचारसंहिता अंशत: शिथील करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत जवळपास आठ हजार कर्मचारी 'क' आणि 'ड' श्रेणीत आहेत. त्यापैकी काहीच कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.बदल्यांबाबत सुधारित मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया प्रत्यक्ष समुपदेशाने केली जाणार आहे.जिल्हास्तरावर ५ते १५ मे, तर तालुकास्तरावर १६ ते २५ मे दरम्यान समुपदेशाने बदलीप्रक्रिया राबविली जाणार आहे. ज्या तालुक्यात नेहमीच पदांची रिक्तता जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा जास्त असते. अशा भागातील तालुक्यातील रिक्त पदे प्रशासकीय अथवा विनंतीने भरणे अभिप्रेत आहे. ज्या कर्मचार्यांनी आदिवासी भागात जास्त वर्षे सेवा केली आहे. त्यांना उर्वरीत भागात जाण्याच्या दृष्टीने व प्राधान्यक्रमात नमूद केलेल्या कर्मचार्यांच्या सोयीच्या ठिकाणी जाणे सुलभ व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेतील गट 'क', 'ड' संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सर्वात जास्त गोंधळ शिक्षकांच्या बदल्यावेळी होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र
By admin | Updated: May 10, 2014 00:25 IST