लोकमत न्यूज नेटवर्क भिसी : भिसी ग्रा.पं.चे सरपंच अरविंद रेवतकर यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अपात्र घोषीत केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यास सदस्य पदावरुन अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे रेवतकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य देवा मुंगले व राजू गभणे यांनी केली आहे. भिसी येथील सरपंच अरविंद रेवतकर यांनी तीन अपत्य असूनही ग्रामपंचायत नामांकन अर्ज दाखल करताना अपत्यासंबंधीच्या दाखल्यावर दोन मुली असल्याचा उल्लेख केला होता. आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अरविंद रेवतकर गटाने १७ पैकी आठ सदस्य निवडून आणले. सत्ता स्थापनेच्या वेळी ठोंबरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सरपंच पदावर रूजू होताच अरविंद रेवतकर यांच्या विरोधात धनराज मुंगले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविली. सदर तक्रारीसोबत अरविंद रेवकर यांना तीन अपत्य असून तिसरी मुलगी स्वरा उर्फ परी अरविंद रेवकर हिचा जन्म ८ आॅगस्ट २०१४ ला झाला असल्याचे तक्रारीत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ -१ नुसार चंद्रपूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी २०१६ ला अरविंद रेवकर यांना अपात्र घोषित केले. त्यानंतर रेवतकर यांनी उच्चायुक्त कार्यालय नागपूर व त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. याचिकेवर उच्च न्यायालयात सर्व माहितीच्या आधारे अरविंद रेवतकरवर एक लाख पाच हजाराचा दंड ठोठावला. तर चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला. वरील सर्व मुद्यांचा विचार करता सरपंच अरविंद रेवतकर यांनी तात्काळ स्वत:ची नैतिक जबाबदारी समजून कायद्याच्या नियमाचे पालन करीत आपल्या सरपंच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रापंचायत सदस्य देवा मुगंले व राजू गभणे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून केली आहे.
सरपंचपदाचा राजीनामा द्यावा
By admin | Updated: May 31, 2017 01:51 IST