चंद्रपूर : जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त करत सोमवारी स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सहपरिवार धरणे आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना, माजी खासदार तथा सकल जैन समाज चंद्रपूरचे अध्यक्ष नरेश पुगलिया म्हणाले, याविरोधात सर्व जैन समाजबांधव जयपूर उच्च न्यायालय तथा सर्वोच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करून न्याय मागणार आहेत. यावेळी निर्दोष पुगलिया, डॉ. महावीर सोईतकर, सुभाष जैन, योगेश भंडारी, अमर गांधी, महेंद्र मंडलेचा आदी उपस्थित होते. नरेश पुगलिया यांनी यावेळी सांगितले, जैन समाजामध्ये संथारा या समाधिस्त होणे ही धर्माची उच्च साधना मानली जाते. शरीराला नश्वर मानून तप, उपवासाने आत्मशुद्धी केली जाते. मात्र न्यायालयाने या विधीची तुलना आत्महत्येशी केल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद २५ मध्ये दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे संविधानिक अधिकारापासून अल्पसंख्याक जैन धर्माचे साधु-संत तथा समाजबांधव वंचित राहू नये, यासाठी या निर्णयावर न्यायालयाकडून पूर्नविचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकल जैन समाजद्वारा याचिका दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सांगितले. जैन धर्माची धार्मिक साधना तथा परंपरेचा सन्मान राखण्यासाठी समाजबांधवानी सोमवारी सहपरिवार मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. निवेदनाच्या प्रति केंद्रीय कायदामंत्री, केंद्रीय गृहमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनाही पाठविण्यात आल्या आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘संथारा’ आत्महत्या नाही, न्यायालयात पुनर्विचार याचिका
By admin | Updated: August 25, 2015 01:09 IST