घुग्घुस : ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर आठ महिने लोटून गेले. अजूनही नगर परिषदेची निवडणूक झाली नसल्याने नगर परिषदेचा कारभार प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. गावातील प्रत्येक वार्डांत विविध समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसने मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना निवेदन दिले.
कचरा वाहून नेणाऱ्या अधिकांश घंटागाड्या नादुरुस्त असल्याने वाॅर्डात कचरा संकलन नियमित होत नाही. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सोलर पॅनल बंद पडले आहे. अनेक वॉटर एटीएम बंद पडलेले आहेत. शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने त्या ठिकाणी लाईट लावण्यात यावे. रस्ते, नाल्या नाहीत. त्यांची यादी बनवून आवश्यक ठिकाणी तातडीने रस्ते नाल्या टाकण्यात यावे. शहरातील कचराकुंडी स्वच्छ करण्यात याव्या, बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्यात यावे व तोटी नसलेल्या नळाला तोट्या लावण्यात याव्या अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदन देताना काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.