फोटो
कोरपना : तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यांच्याच विचारांचा वसा घेऊन कोरोनामुळे शाळेपासून दूर असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देण्याचे पवित्र कार्य गडचांदूर येथील विहारात सुरू आहे.
गडचांदूर येथील पद्माकर खैरे या शिक्षकाने हे कार्य सुरू केले असून, ते महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या शाळा-महाविद्यालयात इयत्ता ५वी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून, नर्सरी ते चवथ्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व अभ्यासात मोठा खंड पडला असून, भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी अहितकारक आहे.
घरी असणाऱ्या छोट्या विद्यार्थ्यांच्या शाळा कधी सुरू होतील, याचा सद्यस्थितीत अंदाज बांधता येत नाही. अशा छोट्या मुलांच्या शिक्षणाची पालकांसमोर ही फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थी पालकांचे घरी ऐकत नसल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी भावना अनेक पालकांची आहे. मात्र, कोरोनामुळे लहान मुलांची ट्युशनही बंद आहेत. त्यामुळे पाल्यांना पाठवायचे कुठे, हा गंभीर प्रश्न पालकांसमोर आहे. पालक व छोट्या मुलांची गरज लक्षात घेता, ध्येयवेड्या शिक्षकाने नि:शुल्क गणिताचे वर्ग सुरू केले आहेत. गडचांदुरातील वेगवेगळ्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचे लहान विद्यार्थी विहारात येऊन शिक्षणाचे धडे घेत असल्याने, विद्यार्थ्यांची शाळेची उणीव काही प्रमाणात भरून निघत आहे.
कोट
लहान मुलांची शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी मोबाइल व इतर खेळांमध्ये व्यस्त आहे. शाळा नसल्याने माझ्या घराच्या आजूबाजूचे विद्यार्थीही दिवसभर अभ्यास न करता केवळ खेळत राहतात, म्हणून दिवसभराची शाळा झाल्यानंतर आपण आपला फावला वेळ जर या विद्यार्थ्यांना शिकविण्यात घालविला, तर विद्यार्थ्यांचा फायदा होईल. म्हणूनच विहारामध्ये संचारबंदीच्या काळापासून सामाजिक अंतर राखून गणित शिक्षणाचे कार्य सुरू केले आहे.
- पद्माकर खैरे, गणित शिक्षक