वरोरा: रस्त्याने धावणारे वाहन अचानक पेट घेतल्याने वाहन पुर्णत: जळून खाक झाल्याची घटना वरोरा-वणी मार्गावरील वरोरा नजीकच्या गणेश मंदिराजवळ गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.वाहन रस्त्याने धावत असताना अचानक इंजिन मधून धुर निघू लागला. त्यामुळे चालकाने वाहन तत्काळ रस्त्याच्या बाजूला थांबवित वाहनातील प्रवाशांना उतण्यास सांगितले. प्रवासी उतरत असतानाच वाहनाने पेट घेतला व अल्पावधीत वाहन जळून खाक झाला. एमएच- ३१ झेड- ८९९१ या क्रमांकाचे अरमडा वाहन बाबा पाचभाई, विमल पाचभाई, छबु धानोरकर, बापूराव टोंगे, नातेबाई टोंगे, माया टोंगे, नयन टोंगे, प्रणय टोंगे, सुनिता जिवतोडे, संध्या जिवतोडे यांना घेवून चालक योगेश पाचभाई वरोरा येथून वणी उखणी येथे जात होते. घटनेनंतर वरोरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलातील भूषण सालवटकर, संतोष पातालबंसी, रवी बरसे, राम बिरीया, शिवा बरसे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत प्रवाशांना कुठलीही इजा झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला वाहन जळत असल्याने वणी-वरोरा मार्गावरील वाहतूक अर्धा तास थांबविण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)
धावते वाहन जळून खाक
By admin | Updated: May 29, 2015 01:37 IST