माहिती अधिकारातून उघड : मनोज पाल यांची पत्रकार परिषदचंद्रपूर : रस्त्यांवरुन धावणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात असते. याच कार्यालयामार्फत खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व व्यवहार चालतात. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांवरुन किती खासगी बसगाड्या धावतात, याबाबत हे कार्यालय अनभिज्ञ असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले, असे शिवसेनेचे पदाधिकारी मनोज पाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.चंद्रपूर- गडचिरोली, चंद्रपूर- चिमूर आणि चंद्रपूर- नागपूर या मार्गाने खासगी बसेस वाहतूक सुरू आहे. दररोज शेकडो खासगी बसगाड्या राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे या गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे असणे अपेक्षित आहे, मात्र शिवसेनचे मनोज पाल यांनी जिल्ह्यातील रस्त्यांवरुन किती वाहने धावतात, किती गाड्यांना आॅल इंडिया परवाना आहे, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली. तेव्हा या कार्यालयाने किती खासगी बसगाड्या धावतात, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच आॅल इंडिया परवाना मुंबईच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून दिला जातो. त्यामुळे किती गाड्यांना हा परवाना आहे. याबाबतची माहिती नसल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरुन खासगी आणि अन्य वाहनांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु, त्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनातून तक्रार केली आहे. येत्या काळात अवैध प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे पाल यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
‘आरटीओ’ खासगी बसगाड्यांविषयी अनभिज्ञ
By admin | Updated: August 14, 2015 01:21 IST