नागभीड : नागभीडसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तपाळ पाणीपुरवठा योजनेला वसुलीच्या समस्येने ग्रासले आहे. या योजनेचे संबंधित ग्रामपंचायतीकडे १८ लाख ८४ हजार ५२० रूपयाची थकबाकी असल्याची माहिती आहे.१९९५ मध्ये युती शासन महाराष्ट्रात सत्तारूढ झाल्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली होती आणि या योजनेत नागभीड तालुक्यातील नागभीड, नवखळा, मौशी, ढोरपा, बाळापूर, देवटेक, चिकमारा, चिखलपरसोडी ही गावे तर ब्रह्मपुरी तालुक्यातील तपाळ, तारेगाव खुर्द आणि तोरगाव (बुज) या गावांचा समावेश करण्यात आला. युती शासनाच्या काळातच या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले आणि १९९९ मध्ये या योजनेचे लोकार्पण करण्यात आले.या प्रादेशिक नळयोजनेतील ११ गावांकडे २०१४-१५ च्या आकडेवारीनुसार एकुण १ हजार २५९ खाजगी नळजोडण्यांची संख्या असून या नळजोडणीवर ९ लाख ६ हजार ४८० रूपये पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. यात उल्लेखनीय बाब अशी की, नागभीड ग्रामपंचायतीअंतर्गत ४३७ खाजगी नळ योजण्या असून या जोडण्यांवर ३ लाख १४ हजार ६४० रुपयाची पाणी कर आकारणी करण्यात आली आहे. सदर प्रादेशिक नळयोजनेची दैनंदिन देखभाल व दुरूस्तीचे काम पाणीपट्टी वसुलीच्या आधारावर निर्धारीत आहे. असे असले तरी संबंधित ग्रामपंचायतीकडून पाहीजे त्या प्रमाणात वसुली होत नसल्याने दैनंदिन देखभाल आणि दुरूस्तीचे काम करताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागासमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. योजनेचे विद्युत पंप बदलविण्याचे आणि शुद्धीकरण केंद्रातील काम करायचे म्हटले तर या कामासाठी ५ लाख रुपयाची आवश्यकता आहे. परंतु, संबंधीत ग्रामपंचायतीकडून पाहीजे त्या प्रमाणात वसुली होत नसल्याने दुरूस्तीचे काम हाती घेताना उपविभागाला विचारच करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा विचार केला तर १८ लाख ८४ हजार ५२० या रकमेपैकी फक्त ३ लाख ५ हजार रुपयाची वसुली उपविभागाला प्राप्त झाली. याचा अर्थ १५ लाख ७९ हजार ५२० रूपये संबंधित ग्रामपंचायतीकडे थकीत आहेत. त्यातल्या त्यात नागभीड ग्रामपंचायतीकडे ५ लाख २९ हजार २८० रुपयाची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)
तपाळ पाणीपुरवठा योजनेचे १९ लाख रूपये थकित
By admin | Updated: August 14, 2015 01:18 IST