३५ वर्षे जुनी मागणी : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली होती दखलराजकुमार चुनारकर खडसंगीभारताच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरुद्ध ‘चले जाव’चे आंदोलन करुन १६ आॅगस्ट १९४२ ला मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्नल क्रांतीकारण शहीद झाले. त्यामुळे चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी ३५ वर्षापासून अनेक आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काही महिन्यापासून जिल्हा निर्मितीचे आंदोलन थंड पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्ह्याची ज्योत मालवली काय, असा प्रश्न चिमूरवासीयांना पडला आहे.देशात इंग्रज राजवट असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता मोठा सहभाग घेतला व अनेक क्रांतीकारकांनी बलीदान दिले. इंग्रज राजवटीपूर्वी चिमूर जिल्हा असल्याचे स्वातंत्र संग्राम सैनिकाकडून सांगण्यात येत होते. त्याचाच धागा पकडून मागील ३५ वर्षापासून चिमूरला चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे काँग्रेस पासून इतरही पक्ष लक्ष देत नसल्याने ही मागणी मागे पडली आहे. मात्र चिमूर जिल्हा कृती समितीकडून निवेदने पत्र व्यवहार काही प्रमाणात सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.चिमूर परिसरातील नागरिकांचा भावनिक प्रश्न असल्याने या मागणीकरिता अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आंदोलने केली आहेत. ५ जानेवारी २००५ मध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये हजारोच्या जमावाने तहसील कार्यालय जाळले. त्यामध्ये अनेक नागरिकांना तुरुंगामध्ये जावे लागले होते. त्यानंतरही हे जिल्हा निर्मितीचे आंदोलन सुरुच होते. निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पुढारी या मागणीचा उहापोह करुन मत मागतात. मात्र निवडणूक संपली की या मागणीला बाजूला सारतात. त्यामुळे चिमूरकर या राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनाने विटले आहेत. चिमूरकरांनी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीकरिता अनेक आंदोलने केली तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गजानन बुटके यांनी उपविभागीय कार्यालयावर चिमूर क्रांती जिल्हा कार्यालय, असा प्रतिकात्मक फलक लावून आंदोलन केले.मात्र दरम्यान तोडफोड झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये जावे लागले. त्यामुळे अनेक आंदोलने केली. मात्र चिमूरकरांच्या पदरी शासनाकडून निराशाचे आली आहे. मात्र एक वर्षापासून कुठल्याही हालचाली नसल्याने चिमूरक्रांती जिल्ह्याची ज्योत मालवली तर नाही ना, असा प्रश्न चिमूर परिसरातील नागरिकांना पडला आहे.स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचीही जिल्हा आंदोलनात उडी१९४२ च्या क्रांती लढ्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी) व स्वर्गीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रभाकर जोशी यांनी चिमूर जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात उडी घेत अनेक आंदोलने केली. त्यामध्ये काळे गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे. तर प्रभाकर जोशी यांनी हयात असताना शासनाला चिमूर जिल्हा झाला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला होता. या आत्मदहनाची दखल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेत पत्रव्यवहार करुन जोशी यांना आत्मदहन करण्यापासून रोखले होते. आजघडीला ९३ वर्षीय काळे गुरुजी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीवर ठाम असून मरेपर्यंत चिमूर जिल्ह्यासाठी संघर्ष करणार असल्याचे ठासून सांगतात.चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी ३५ वर्षे जुनी असून चिमूर जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षिय कृती समिती स्थापली आहे. या कृती समितीकडून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. या समितीच्या वतीने मागच्या वर्षी १ आॅगस्ट ते १६ आॅगस्टदरम्यान आंदोलने केली. तर आजही कृती समितीद्वारे जिल्ह्यासाठी शासनदरबारी मुख्यमंत्री, महसूलमंत्री व पालकमंत्री यांना पत्र व्यवहार सुरु आहे. चिमूर जिल्हा होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्ह्याची ज्योत आजही मालवली नसून ती तेवत आहे. - नरेंद्र बंडे (राजुरकर) अध्यक्ष,चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती
क्रांती जिल्ह्याचा विसर
By admin | Updated: August 14, 2015 01:25 IST