कृती समितीचीही स्थापना : हालचालींना वेगब्रह्मपुरी : महाराष्ट्रात नविन २२ जिल्हे नव्याने निर्माण केले जाणार आहेत. तसे प्रस्ताव शासनस्तरावर मागविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वर्तमानपत्रातून निदर्शनास आले होते. परंतु लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या जिल्ह्याच्या संदर्भात कुठल्याही हालचाली शासनस्तरावरून आताच करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र आता ब्रह्मपुरीकरांनी जिल्हा मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात शासनाला उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या माध्यमातून पत्रकार संघातर्फे निवेदन देऊन तशी मागणी केली आहे.शासनस्तरावर नविन जिल्हे निर्माण करण्याविषयी हालचाली सुरू असोत अथवा नसोत. पण वेळोवेळी ब्रह्मपुरीवर जो अन्याय केला जात आहे, तो आता सहन केला जाणार नाही. यासाठी ब्रह्मपुरीकरांनी रंगशिंगे फुंकण्याकरिता आंदोलनाची तयारी केली आहे. ‘लोकमत’मध्ये ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी ब्रह्मपुरीकर रणशिंगे फुंकणार, ही बातमी धडकताच ब्रह्मपुरीत हालचालींना आता वेग आला आहे.अनेक राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात वावणाऱ्या नागरिकांनी चर्चा करून एकत्रित येऊन मोठी जिल्हा कृती संघर्ष समिती स्थापन करून लढा देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र निर्माण होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुरी पत्रकार संघाच्या वतीने शासनाला जाणीव करून देण्यासाठी नुकतेच उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना नेताजी मेश्राम, विजय रामटेके, प्रा. रवी रणदिवे, प्रा. विजय मुळे, अरविंद चुनारकर, दत्तात्रय दलाल, दिवाकर मंडपे, जीवन बागडे, शालीक साहारे, दीपक पत्रे, महेश पिलारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.बह्मपुरी जिल्हा निर्मितीबाबत शासनाने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणीही केली. (तालुका प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी पत्रकार संघातर्फे निवेदन
By admin | Updated: August 28, 2015 01:24 IST