चंद्रपूर: राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समितीच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ११२ वी जयंती अर्थात ग्रामजयंती विविध वैयक्तिक आभासी उपक्रमातून साजरी करण्यात आली.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही करण्यात आले. घरातून बाहेर न पडता महिलांसाठी घर तेथे रांगोळी रेखाटन, विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा तसेच घरच्या सदस्यांनी घरस्वच्छता आणि घरीच ग्रामगीता वाचन असा सर्वांनाच सोयीचा उपक्रम घेण्यात आला. स्पर्धकांनी आपल्या उपक्रमाचे छायाचित्र आयोजक समितीकडे पाठविले. कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सामुदायिक ध्यानपाठ व प्रार्थना, मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात आले. यावेळी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनीही मार्गदर्शन केले. सप्तखंजिरीवादक उदपाल वणीकर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. या संपूर्ण आभासी कार्यक्रमाचे नियोजन रामकृष्ण चनकापुरे , सुभाष पावडे, देवराव कोंडेकर ,राजेंद्र मोहितकर ,संजय तिळसम्रूतकर ,श्रीकांत धोटे , संजय वैद्य , शंकर दरेकर , सुखदेव चौथाले , भाऊराव बोबडे आदींनी केले.