चंद्रपूर : इको-प्रो तर्फे रामाळा तलाव संवर्धनासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन संपताच सोमवारपासून श्रमदान करून रामाळा स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी तलावाची पार असलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे झाडी-झुडपे काढून तसेच गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन व छटपूजादरम्यानचे माठ व जलपात्र संकलन करण्यात आले.
रामाळा तलाव संवर्धनाच्या आंदोलनासोबतच तलाव स्वच्छतासंदर्भात लोकसहभागातून स्वच्छता अभियान सुरू केले आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेत इको-प्रोचे सदस्य एकत्रित येत नियमित स्वच्छता करणार आहेत. यात प्रामुख्याने किल्लाच्या भिंतीतून निघालेली वृक्षवेली, झाडे-झुडपे काढण्यात येणार आहेत.
सोमवारी इको-प्रोच्या सदस्यांनी विसर्जन पाॅइंटच्या दोन्ही बाजू, किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली झुडपे काढली. यापूर्वी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनीसुध्दा काही झाडे काढली आहेत. रविवारी काही विद्यार्थ्यांनी तलावकाठावरील प्लॅस्टिक कचरा जमा करून स्वच्छता केली. स्वच्छता अभियानात सहभागी होणाचे आवाहन इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी केले आहे.
बाॅक्स
प्रशासनाकडून त्वरित काम सुरू होणे गरजेचे
या उन्हाळ्याचा काळातील ९० दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, तलाव कोरडा होणे आणि खोलीकरणास हा वेळ पुरेसा नाही. यात या दिवसाचे योग्य नियोजन करून काम पूर्णत्वास जाईल याकरिता प्रशासनाकडूनसुध्दा लवकरात लवकर कामाची सुरुवात होणे गरजेचे आहे.
बाॅक्स
फोटो
माठांचा पक्षी जलपात्र तसेच वृक्षारोपणासाठी वापर
इको-प्रोने रामाळा तलाव स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. दरम्यान, तलावाच्या काठावर जमा झालेली गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन तसेच छटपूजादरम्यानचे मोठ्या प्रमाणात माठ, जलपात्र एकत्र करण्यात आले आहे. ्त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यांचा वृक्षारोपणासाठी तसेच पक्ष्यांसाठी जलपात्र म्हणून वापर करण्यात येणार आहे.