राजोली : राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे या तलावात जेमतेम पाणी जमा झाले. या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ झाला असता. तेवढा जलसाठाही उपलब्ध होता. परंतु सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष करुन ही बाब गांभिर्याने घेतली नाही. नियोजनाअभावी आता तलावात अत्यल्प जलसाठा उरला आहे. वरुनराजाने कृपा केली तरच पिके वाचू शकतील. अन्यथा तलावाखाली असणारे सर्वच धान करपून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून या तलावाच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ सांडव्याचे काम वगळता उर्वरित कामे अर्धवट करुन कंत्राटदाराने उन्हाळ्यातच काम बंद केले. या अर्धवट कामामुळे नहरातील पाणी वितरणात अडसर निर्माण होत आहे. नहराला सिमेंट अस्तरीकरण करताना तांत्रिक बाब तपासून न पाहता काम केल्यामुळे मुख्य गेट जवळच सुमारे दोन फुट पाणी अडून पडले आहे. वितरिकेची कामे तज्ज्ञ कामगारांकडून करवून घेण्यात न आल्याने त्यातून पाणी बाहेर पडतच नाही. काही ठिकाणी नहरात पाणी अडवून पाटचारीत पाणी टाकावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे पाण्याच फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून सिंचन विभागाने या विषयात हात वर केले आहे. एवढ्यात जर वरुणराजाने कृपा झाली. जोरदार पावसाचे आगमन झाले तरच येथील धान पिके तग धरणार आहेत. अन्यथा हातचे पीक हिरावून घेतल्याचे दु:ख कास्तकाराना सोसावे लागणार आहे. (वार्ताहर)
राजोली मामा तलावाखालील धान पिके धोक्यात
By admin | Updated: October 12, 2014 23:43 IST