ब्रह्मपुरीत नवे एसडीओ रूजू : रखडलेल्या घाटांच्या लिलावासाठी पुढाकारनागभीड : जिल्ह्यातील इतर उपविभागातील रेती घाट लिलावात निघाले असले तरी, ब्रह्मपुरी उपविभागातील रेती घाट मात्र विविध कारणांमुळे लिलावात निघू शकलेले नाही. हे घाट लिलावात का निघू शकले नाही, यासाठी ब्रह्मपुरी येथे नव्यानेच रुजू झालेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे.महसूल विभागाच्या ब्रह्मपुरी उपविभागात नागभीड, ब्रह्मपुरी या दोन तालुक्याचा समावेश आहे. या उपविभागासाठी सीमा अहीरे यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती होती. अहीरे यांनी या दोन तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव व्हावा यासाठी जी प्रक्रिया अवलंबावी लागते ती प्रक्रिया अवलंबली. पण काही कारणांमुळे रेती घाटांचे लिलाव होऊ शकले नाही.याच आठवड्यात उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांचे स्थानांतरण गोंडपिपरी येथे करण्यात आले आणि त्यांच्या जागी उमेश काळे हे नवीन उपविभागीय अधिकारी रुजू झाले आहेत. विश्वसनीय माहितीनुसार आल्या आल्याच त्यांनी उपविभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत रेती घाट लिलावात न निघाल्याचा मुद्दा चर्चेत निघाला. रेतीघाटांचा लिलाव अद्याप का करण्यात आला नाही, यामागची कारणे काय, या मागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण पुरेशी उत्तरे त्यांना यावेळी मिळाली नाही. दरम्यान याच बैठकीत त्यांनी रेतीघाट लिलावाचे जे काही सोपस्कार असतील ते त्वरित पूर्ण आदेश करण्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याचे समजते. या बैठकीतील निर्देश लक्षात घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या कामाला लागल्याचीही माहिती आहे. ब्रह्मपुरी नागभीड तालुक्यात रेतीचे अनेक घाट आहेत. पण ते अद्याप ही लिलावात न काढल्याने रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. (तालुका प्रतिनिधी) अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून अवैध वसुलीभेजगाव : येथील उमा नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावर आळा घालण्याऐवजी एक वनरक्षक व पोलिसांनी कारवाईचा धाक दाखवून अवैधपणे वसुली करीत असल्याची ओरड ट्रॅक्टरधारक व ग्रामस्थांमधून होत आहे. भेजगावजवळ उमा नदी लागून असून येथील नदी पात्र उच्च दर्जाच्या रेतीसाठी प्रसिद्ध आहे. प्रशासनाच्या वतीने या रेती घाटाच्या लिलाव होतो. मात्र यंदा रेती वाहतूक करण्यास प्रशासनाने रितसर आदेश दिले नाही. असे असतानाही भेजगाव परिसरातील ट्रॅक्टरधारक रात्रीच्या सुमारास चोरट्या मार्गाने रेतीची सर्रासपणे वाहतूक करून प्रशासनाच्या महसूल बुडवत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन भेजगाव परिसरातील कधी वनरक्षक तर कधी पोलीस उपनिरीक्षक सहायकासोबत गस्त घालून अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी धाक दाखवून पाच-दहा हजारात आर्थिक तडजोड करुन वाहन सोडून देत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे. या प्रकसारामुळे प्रशासनाचे लाखो रुपयाचे महसूल बुडत असून पोलीस मात्र गब्बर होत असल्याचे चित्र आहे. सज्जनाचे संरक्षण आणि दृष्टांचा संहार हे पोलीस प्रशासनाचे ब्रिद वाक्य असले, तरी प्रत्यक्षात पोलीस मात्र खाकी वर्दीचा आण आणत या ब्रिद वाक्यालाच काळीमा फासत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडत चालला असून तालुका प्रशासनाने चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा फास आवळावा व अवैध रेती वाहतूक व अवैध वसुली थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रेतीघाट एसडीओंच्या रडारवर
By admin | Updated: March 3, 2016 01:09 IST