चंद्रपूर : शासनाने घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले. मात्र रेतीघाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीची अवैधप्रकारे बेभाव विक्री सुरु आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल बांधकामाकरिता रेती उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. घरकुल बांधकामाकरिता शासनाकडून फक्त दीड लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. परंतु, शासनाने अद्यापही घरकुल योजनेचे अनुदान वाढवले नाही. रेती घाटाचे लिलाव रखडले आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देवून रेतीची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याकडे लक्ष देवून प्रशासनाने घरकुल बांधकामाकरिता रेती उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनातून केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, चंद्रपूर विधानसभा प्रमुख दीपक खारकर, संभाजी ब्रिगेड शेणगावचे अध्यक्ष मंगेश चटकी, कोषाध्यक्ष राकेश भगत आदी उपस्थित होते.