गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा
जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. परिणामी, मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, परंतु रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावरील अंधार दूर करा
कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरले असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, तालुका क्रीडासंकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस
भद्रावती : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील काही गावांतील शिवारात जंगली प्राण्यांनी शेतात धुमाकूळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेल्या पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोसा उत्पादकांच्या समस्या सोडवा
चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा (रेशीम) उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात कोसा उत्पादन घेतल्या जाते. झाडावरून कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे. चिमूर तालुक्यात मोटेगाव, काजळसर, सिंदेवाही-सावली तालुक्यात पेंढरी व पाथरी भागात भोई-ढिवर समाजाचे गरीब कुटुंब कोसा उत्पादन घेतात.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
राजुरा : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डासांचा उच्छाद वाढला
मूल : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवाव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. मात्र, काही आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
जनावरांना टॅग लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आता दुधाळू जनावरांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जनावरांना टॅग लावून नोंदणी करणे गरजेचे आहे.
पठाणपुरातील नाल्या घाणीने तुंबल्या
चंद्रपूर : पठाणपुरा परिसरातील नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.
वरोऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी
वरोरा: येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीचे गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. रस्त्याअभावी अनेक वेळा अपघातही झाले आहेत.
निधीअभावी बांधकाम थांबविले
चंद्रपूर : जिल्ह्यातील सिमेंट रस्ते बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. बहुतेक ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने कामे थांबविल्याचे दिसून येते. अर्धवट कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी केली जात आहे.
वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी
चंद्रपूर : रामनगर-दाताळा परिसरात वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यावर अनेक शाळा असल्याने सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रामनगर चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंचायत राज प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेला केवळ निवडक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित राहत असल्याचे वास्तव्य बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे ग्रामसभेला पंचायतराज पद्धतीची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
चंद्रपूर : शहरापासून तालुकास्थळी जाणाऱ्या विविध मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यातील नगरपरिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. अनेकदा पदोन्नीसाठी आंदोलन करण्यात आले, परंतु त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे अर्हताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिली आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
गडचांदूर: शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यामध्ये कुत्रे उभे राहत असल्याने, मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले.
अतिक्रमण काढण्याची मागणी
चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे, याशिवाय येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र, सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होऊन या रस्त्यावरून वाहन काढताना त्रास होत आहे.
कोरपना-वणी बससेवेची मागणी
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी बसफेरी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वणी शहर या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. परिणामी, शेकडो नागरिक ये-जा करतात, शिवाय या मार्गावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगाव चौकी, शिरपूर, कुरई, आबई, वेळाबाई, ढाकोरी बोरी, मुर्ती आदी गावातील नागरिकांना हिच शेवटची बस आहे.
वनसडी मार्गावर जीवघेणे खड्डे
कोरपना : वनसडी-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. यामुळे अपघाताची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची करण्यात आली आहे.
सर्पमित्रांना साहित्य पुरवावा
चंद्रपूर : सर्पमित्रांना स्टिक, हँडग्लोज, किट आदी साहित्य देण्याची मागणी सर्पमित्रांनी केली आहे. साप दिसल्यास नागरिक सर्पमित्राला बोलावतात. मात्र, कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने शासनाने साहित्य पुरवावे, अशी मागणी केली जात आहे.
एटीएमची सुरक्षा वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभही घेत आहे. मात्र, काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसू येत आहे.
झुडपे ठरत आहेत जीवघेणे
चंद्रपूर : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झुडपे तोडून वाहनधारकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
प्लास्टीकबंदी कागदावरच
चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी प्लास्टीकची विक्री सुरू आहे. प्लास्टीकचे दुष्परिणाम बघता, राज्य शासनाने प्लास्टीकवर बंदी घातली. त्यानंतर, त्याचा वापर न करण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, सध्या मोहीम थंडावली आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. याबाबत कल्पना असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टीकचा वापर सुरू आहे.
उमा नदीवरील पुलाची उंची वाढवा
सिंदेवाही : तालुक्यातील कळमगावजवळील उमा नदीवर अस्तित्वात असलेला पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे.