भद्रावती : वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा लढा शेतकऱ्यांच्या संघर्षमय भूमिकेने जिंकल्या गेला. आता अन्य प्रकल्पग्रस्तांनाही त्यांच्या जमिनीचा पुरेसा मोबदला मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याकरिता सर्व खासगी कोल ब्लॉक्स कोल इंडियाला देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील किलोनी येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.ते म्हणाले, देशात ब्रिटीशांच्या काळापासून अंमलात आलेला भूमी अधिग्रहण १८९४ च्या काळ्या कायद्यामुळे देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या लुटल्या गेला. या शेतकऱ्यांची मानसिक कोंडी सातत्याने झाली. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींसाठी संपादित झालेल्या जमिनीशी निगडित शेतकऱ्यांना या कायद्याने उद्ध्वस्त केले. त्यामुळे या कायद्याविरूद्ध १९९८ पासून आम्ही लढा देऊन हा कायदा बदलण्यात मोलाचे कार्य केले. या कायद्यात अनेक दुरूस्त्या सुचविण्यातही आम्ही यशस्वी ठरलो. मात्र या लढ्यासाठी ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी समर्थपणे साथ दिली व आपल्या पदरात न्याय पाडून घेतला ते शेतकरी या यशाचे खरे शिल्पकार होते, असेही ना.अहीर म्हणाले. आम्ही वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांचा लढा जिंकला आहे. आता अन्य प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही सत्तेत राहून हा लढा मार्गी लावू वेळप्रसंगी संघर्षाची भूमिका स्विकारावी लागेल तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तशी भूमिका स्विकारू, असे अभिवचन केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने दिले. अहीर पुढे म्हणाले, वेकोलि प्रकल्पग्रस्तांना ६ ते १० लक्ष प्रती एकरी मोबदला मिळवून दिला. याचा लाभ नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील तसेच सावनेर, उमरेड आदी ठिकाणच्या खाण प्रकल्पग्रस्तांनाच मिळाला नसून तो देशभरातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना मिळाला. आता अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची वेळ आली आहे. व त्यासाठी आपण सज्ज आहोत. सेंट्रल कॉलरीज माईन्स, सनफ्लॅग माईन्स, कर्नाटका एम्टा माईन्स, बैद्यनाथ माईन्समध्ये हजारो हेक्टर शेतजमिनी मातीमोल भावाने संपादीत झाल्या असून एकट्या बैद्यनाथने २६२ हेक्टर शेतजमिनी घेतल्या. ब्लॉक घेतले व उद्योग सुरू केले. परंतु शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. या अन्यायविरूद्ध शेतकऱ्यांच्या सोबतीने या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून लढा उभारू. डागानी प्रति एकर ६ ते १५ हजार, कर्नाटक एम्टाने १.५ ते ४ लाख भाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केली. कर्नाटक एम्टाने मर्यादा ओलांडून जमिन मालकांनाच जेलमध्ये डांबले, पोलिसांकरवी मारले, उपाशी ठेवले एम्टावाल्याना कदापीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले. या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे, राहूल सराफ, ओम मांडवकर, नरेंंद्र जिवतोडे, अशोक हजारे, रवी नागपुरे, अर्चना नरेंद्र जिवतोडे, प्रवीण सातपुते यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
खासगी कोळसा खाणी कोल इंडियालाच द्याव्यात - हंसराज अहीर
By admin | Updated: December 13, 2014 01:21 IST