चंद्रपूर : येथील रय्यतवारी रिट मधील जमिन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अधिग्रहीत केली. उर्वरित जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी वीज केंद्राने रस्त्याच ठेवला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. किमान शेतात जाण्यासाठी रस्ता करून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्र्यांपासून तर प्रशासनापर्यंत सर्वांना निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही.चांदा रय्यतारी रिठमधील हजारो एकर जमीन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने १९८० पूर्वी भूसंपादन केली. प्रकल्पाने भूसंपादन केल्यानंतर उर्वरित असलेल्या जमिनीवर शेतकरी शेती करून उपजिवीका करीत आहे. मात्र या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याच नाही. त्यामुळे शेतात जायचे तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, एका बाजूने सेंट्रल रेल्वे लाईन आहे तर दुसऱ्या बाजूने महाऔष्णिक वीज केंद्रासाठी कोळसा व इतर माल वाहतूक करण्याकरिता रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतात बैलबंडी किंवा ट्रॅक्टरला जाण्यासाठी रस्ता नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन रस्त्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी प्रिकास्ट ब्रिज तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र सदर काम काही दिवसाताच बंद पडले. त्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाकडे पायपीट सुरु केली आहे. मात्र अद्यापही रस्ता तयार करून देण्यात आला नाही. आता केंद्रात आणि राज्यात आपल्या शहरातील मंत्री असल्याने या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, चंद्रपूर वीज केंद्राच्या मुख्य व्यवस्थापकांना शेतकऱ्यांनी निवेदन देत रस्ता तयार करून देण्याची मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
वीज केंद्राने अडला रस्ता
By admin | Updated: December 13, 2014 01:17 IST