मनपाची घोषणा फसवी : हिरवे शहर, स्वच्छ शहरांचे स्वप्न भंगलेचंद्रपूर : महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने 'हिरवं शहर, स्वच्छ शहर' असे आश्वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ लोटला तरी या आश्वासनाचा पत्ता नाही. उलट शोभेची लावलेली झाडेदेखील आता सुकली आहेत. लाखो रुपयांचा हा खर्च वाया गेला आहे. ६00 पैकी केवळ २५ते ३0 झाडे सध्या जिवंत आहेत.चंद्रपूरला महानगरचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. ही सत्ता मिळविण्यासाठी ज्या घोषणा देण्यात आल्या. त्यामध्ये हिरव्या शहराची घोषणा होती. शहरात झाडे नसल्याचे तापमानही खूप वाढत असते. त्या दृष्टीने काँग्रेसने महत्त्वाची घोषणा केल्याने लोकांनीही प्रतिसाद दिला.या घोषणेची पूर्तता करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने शहरातील प्रमुख मार्गावर पाम प्रजातीची झाडे लावण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी ४00 पाम झाडे आणि ७00 ट्री गार्ड खरेदी केले. यासाठी १0 लाख रुपयांचा खर्च केला. मुख्य असलेल्या गांधी आणि कस्तुरबा या दोन मार्गावर ही झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मात्र त्यांचे नीट संगोपन नसल्याने अवघ्या वर्षभरात ही झाडे सुकून गेली. अनेक झाडे रस्ता बांधकामात उखडण्यात आली. रस्त्याच्या कडेला 'पेवर ब्लॉक' टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठीसुद्धा ही झाडे काढून फेकण्यात आली.आधीच चंद्रपुरात झाडे नाहीत आणि जी लावली ती टिकवण्याचा प्रयत्नही झाला नाही. त्यामुळे हिरव्या शहराची घोषणा ही फसवीच निघाली.खासगी उद्योगांना वृक्षारोपण सक्तीचे आहे. पण, तेही कधी वृक्षारोपण करीत नाहीत. नेत्यांना तर मलिदा खाणे, एवढेच माहिती आहे. त्यामुळे उद्योगांवर त्यांचाही अंकुश राहिलेला नाही. आता महापालिकेनेही तेच केले. खर्च करून लावलेल्या झाडांचेही संगोपन करता येत नसेल, तर अशा प्रकल्पांवर खर्च करायचाच कशाला, हे शहाणपण कुणालाही सुचले नाही. नागरिकांनी जबाबदारी घ्यावी आणि संगोपन करावे, असा उलट सल्ला महापालिका देत आहे. (शहर प्रतिनिधी)
झाडे लावली अन् तोडलीही
By admin | Updated: May 10, 2014 00:26 IST