१० गावे प्रभावित : पावसाचे प्रमाण कमी असल्याने वाढली चिंतालोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुझलनेत कमी आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपाचा हंगाम हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये जवळपास १० गावांतील शेतकरी प्रभावित झाले असून रोवणीची कामे खोळंबली आहे. दमदार पाऊस येईल व धानाचे चांगले उत्पादन होईल, अशी आशा मावळत असल्याचे दिसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांचा हा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असतो. बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू असल्याने निसर्गाच्या जलचक्रावरच शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. याच हंगामावर शेतकऱ्यांना वर्षभराची उदरनिर्वाहाची तरतूद करावी लागते. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात भात, कापूस, सोयाबीन, तूर, मिरची व भाजीपाला पिकांसह काही प्रमाणात कडधान्याचे उत्पादन घेतात. यामध्ये भात, कापूस व सोयाबीन हे पीक प्रमुख आहेत. कवडजई, मानोरा, आसेगाव, मोहाडी तुकूम, गिलबिली, इटोली, किन्ही, पळसगाव, कोर्टिमक्ता, कोर्टितुकूम, निमगाटा मक्ता, निमगटा चेक आदी भागातील शेतकऱ्यांसाठी भात हेच प्रमुख पीक आहे.तालुक्यात एकूण सर्वसाधारण कृषीक्षेत्र नऊ हजार ३५९ हेक्टरचे आहे. यातील सात हजार १५ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीपाची पिके घेतली जातात. यात भात पिकाचे क्षेत्र दोन हजार ९०४ हेक्टरचे असून शेतकरी रोवणी करून भाताचे उत्पादन घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला पसंती दिली आहे. यामुळे कापसाची लागवड तीन हजार ११५.८० हेक्टरपर्यत पोहचल्याचे कृषी विभागाच्या खरीप हंगाम पेरणी अहवालावरून दिसून येते. गतवर्षी येथील शेतकऱ्यांनी ३३३.९० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. आजघडीला तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात व कापूस पीक घेत आहेत. परंतु आजपर्यंत तालुक्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत २५ टक्केच झाल्याने धानाची रोवणी करणारा शेतकरी चिंतातूर झाला आहे.कमी पावसामुळे पऱ्हे कोमजले असून किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले असून तालुक्यातील शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाशी सामना करण्याची वेळ ओढविली आहे. पावसाचे दोन महिने पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पावसाने निम्मीही सरासरी गाठली नाही. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधाही नाही. निसर्गाने दगा दिल्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील धान उत्पादन शेतकऱ्यांना भवितव्याच्या चिंतेने ग्रासले आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र अद्याप निकष न ठरल्याने गोंधळाची स्थिती आहे. एकीकडे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण नाही. तर दुसरीकडे धान उत्पादक शेतकरी पावसाअभावी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे कर्जाचे ओझेही दिवसेंदिवस वाढत आहे. या गावातील शेतकऱ्यांना फटकाबल्लारपूर तालुक्यात खरिपाच्या हंगामात एकूण सात हजार १५ हेक्टर क्षेत्रापैकी दोन हजार ९०४ हेक्टरमध्ये धानाची रोवणी, तीन हजार ११५.८० हेक्टरमध्ये कापसाची लागवड, ११९.२० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला, ३७३.३० हेक्टरात तूर तर ३३३.९० हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड केली जाते. यातील कवडजईमध्ये एकूण ५८५ हेक्टरपैकी ५५५ हेक्टरमध्ये धान रोवणी केली जाते. हरणपायली ७५ पैकी ५५ हेक्टर, निमगटा चेक १७० हेक्टर, इटोली २७५ हेक्टर, मानोरा २७४ हेक्टर, किन्ही ३८०, कोर्टीमक्ता १५४ हेक्टर, पळसगाव १७० हेक्टर, गिलबिली १२७ हेक्टर, मोहाडी तुकूम ६० हेक्टर, निमगटा मक्ता शंभर हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जात असून मात्र यंदा येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढविले आहे.
बल्लारपूर तालुक्यात धान उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:46 IST