ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी बीआरएसपी शाखा ब्रह्मपुरीच्यावतीने तहसीलदारमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती आहे हे आम्हाला मान्य आहे. तरीपण शिक्षण सोडता सर्व जनजीवन सुरळीत सुरू आहे. राज्यातील सर्व सभा, कार्यक्रम, संमेलन, बाजार, बससेवा, रेल्वे, दारू दुकाने व इतर सर्व सेवा सुरू आहेत. त्याचप्रमाणे सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करावे. जर शाळा असेच बंद राहिल्या तर येणारी पिढी, समाज व देशाचेच भवितव्य धोक्यात येईल. कारण आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा व कॉलेज सुरू करण्यात यावे अन्यथा बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा एक आठवड्यानंतर ब्रह्मपुरीच्या प्रत्येक चौकात शाळा लावून मुलांना शिकवण्याचे काम करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन-प्रशासनची असेल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना रोशन मेंढे, प्रगती शेंडे, संगम मेश्राम, निखिल रामटेके, अंकित घोडेस्वार, धम्मदीप रामटेके, पल्लवी मेश्राम, राजेश्वरी लोखंडे, अमर रामटेके, नितीन फुलझेले, ममता मेश्राम, अविनाश तुपटे, चेतना कौरवते, सिमरन नगराळे, प्रेमानंद कुथे उपस्थित होते.