न्यायालयाचे आदेश : विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरणवरोरा : वर्धा नदीच्या पात्रात मार्डा घाटात उत्खनन करून खड्डे केले. त्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जबाबदार असलेल्यावर गुन्हे दाखल करून तपास करण्याच्या मागणीकरिता न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला. न्यायालयाने वरोरा तालुक्यातील दोन कंपनी व एका कंपनी संचालकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून वरोरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास कामाला प्रारंभ केला आहे.वरोरा तालुक्यात अनेक कंपन्या आल्या असून त्यांनी उत्पादन सुरू केले आहे. कंपन्यांना काही कामाकरिता गौण खनिजाची आवश्यकता असल्याने अनेक ठिकाणी विना परवानगीने गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. याप्रकरणी अनेकदा महसूल विभागाने अवैध खोदकाम करणाऱ्या कंपन्याकडून दंडही वसूल केला आहे. यासोबतच वर्धा नदीवरील मार्डा घाटात बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यामधून औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्यांना पाणी देणार आहे. या बंधाऱ्याच्या कामाकरिता वर्धा नदीत खोदकाम केले आहे. या खड्डयात पाणी आहे. या खड्डयात बुडून श्रेयश खोब्रागडे या दहावीतील विद्यार्थ्यांचा काही दिवसापूर्वी बुडून मृत्यू झाला होता. या खड्डानजीक सुरक्षा रक्षक व सूचना फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे, याकरीता विनोद खोब्रागडे यांनी वरोरा न्यायालयात अर्ज १२ गैरअर्जदाराविरूद्ध दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने सदर अर्ज अशंत: मंजूर करीत साई वर्धा पॉवर, डीएनआर इम्फ्रा इंजिनियरिंग कन्स्ट्रक्शन कंपनी तसेच दिनेश नाईक व्यवस्थापक डीआरएन इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कंपनी मोजा विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (तालुका प्रतिनिधी)
दोन कंपनीसह एका संचालकावर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 19, 2016 00:40 IST