नागभीड : साधा नाश्ता करतो म्हटले तर ३० रुपये मोजावे लागतात. पण शासन आरोपीच्या जेवणाच्या खर्चासाठी केवळ २० रुपये देत आहे. महागाई दररोज नवे उच्चांक गाठत असली तरी गेल्या सहा-सात वर्षांपासून शासन याबाबत काहीच निर्णय घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आरोपींना एखाद्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा पीसीआर असेपर्यंत हे आरोपी स्थानिक पोलिसांच्या कस्टडीत असतात. कस्टडीत असेपर्यंत आरोपीच्या आरोग्याची काळजी आणि जेवणाची व्यवस्था करणे ही स्थानिक पोलीस ठाण्याची जबाबदारी असते. आरोपीची आरोग्य तपासणी स्थानिक शासकीय रुग्णालयातून करून घेण्यात येते. पण जेवण मात्र हॉटेलमधूनच बोलवावे लागते.ही जेवणाची व्यवस्था स्थानिक पोलीस गावातीलच एखाद्या हॉटेलमधून करीत असतात. पण शासनाकडून मिळणारा जेवणाचा मोबदला अतिशय अल्प म्हणजे केवळ २० रु. देण्यात येत आहे आणि गेल्या सहा-सात वर्षापासून शासनाचा हाच दर कायम आहे. पाच-सहा वर्षापूर्वी दहा रुपये किलोप्रमाणे मिळणारा तांदूळ आता ४० रु. किलो दराने विकत घ्यावा लागत आहेत, हे विशेष.(तालुका प्रतिनिधी)
आरोपींच्या खुराकीसाठी केवळ २० रुपये
By admin | Updated: December 21, 2014 22:56 IST