प्रशासनानेही पुढाकार घ्यावा : पिंपळवृक्ष संवर्धनाची नितांत गरजचंद्रपूर : हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानली जाणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चंद्रपुरातील १०० वर्षे पेक्षा जास्त वयाची पिंपळवृक्ष दुर्लक्षित पडली आहेत. पर्यावरण मित्रांनी शहरभर फिरून या वृक्षांची पाहणी केली असता शंभर वर्षांपूर्वीची केवळ दहाच पिंपळवृक्ष शहरात शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यामुळे चंद्रपूरसारख्या प्रदूषित शहरात पिंपळवृक्षांचे जतन करणे गरजेचे झाले आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करीत आहे. तरीही वृक्षांचा झपाट्याने ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. चंद्रपूर शहराला लागून अनेक उद्योग आहेत. त्यामुळे चंद्रपूरही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. त्या तुलनेत शहरात हिरवळ दिसत नाही. शंभर वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांचेही चंद्रपूरकर व येथील प्रशासन जतन करू शकले नाही. साधारणत: वडाचे वृक्ष सर्वाधिक काळ जगतात. त्यानंतर पिंपळाच्या वृक्षांचेही वयोमान अधिक आहे. येथील पर्यावरणमित्र तथा ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे व वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी चंद्रपूर शहरातील वयोवृद्ध पिंपळ वृक्षांची पाहणी केली असता शंभर व त्यापेक्षा अधिक वर्षांचे जुने पिंपळवृक्ष केवळ दहाच्या संख्येतच शिल्लक असल्याचे वास्तव पुढे आले. ही मोठी झाडे पर्यावरण व धार्मिक दृष्टया अतिशय महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे जतन करणे गरजेचे झाले आहे.प्रा. चोपणे व सपकाळे यांनी शहरातील १०० ते २०० वर्ष वयाच्या पिंपळ वृक्षाच्या अस्तित्वाचा तपास करण्याची मोहीम हाती घेतली. यात सिव्हील लाईन परिसरात दोन, महाकाली परिसरात पाच, तुकूम परिसरात एक, बंगाली कॅम्प परिसरात एक, पठाणपुरा परिसरात एक अशी १०० ते २०० वर्षाचे मोठे दहाच वृक्ष शिल्लक असल्याचे दिसून आले. पिंपळाचे लहान वृक्ष शंभरच्या जवळपास आहेत. (शहर प्रतिनिधी)
चंद्रपुरात उरले शंभर वर्षांपूर्वीचे केवळ १० पिंपळवृक्ष
By admin | Updated: December 25, 2014 23:28 IST