चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सोयाबीन-पाम तेल प्रति लीटर १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत तेलाचे दर १३५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच वापरावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर स्थिर असतानासुद्धा तेलाचे दर वाढत असल्याने जनसामान्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने जनसामान्यांकडून ओरड होत असतानाच मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. पूर्वी कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन कंठीत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ केल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. आठवडभरापूर्वी सोयाबीन तेल किरकोळ बाजारपेठेत १२० रुपये होते. मात्र आता त्यामध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने १३५ रुपयांवर पोहोचले आहे. तर पामतेल १२५ रुपये प्रति लीटर, आरबी १२५ रुपये, फल्ली तेल १६०, सूर्यफूल १६५ रुपये प्रति किलो विक्री केले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
बॉक्स
साखर स्थिर तर डाळीमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ
मागील महिनाभरापासून साखरेचे दर ३६ रुपये किलो स्थिर आहेत. तर डाळीच्या दरामध्ये चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत तूरडाळ शंभर ते ११० रुपये किलो, चणाडाळ ७० ते ८० रुपये, मसूर ७० ते ८०, मूंगमोगर १०० ते ११०, मूगडाळ १०० ते ११० रुपये प्रतिकलोने विक्री होत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणातील वरण बनवणे कठीण झाले आहे.