मुलाखत : युपीएससी परीक्षेतील बाजीगर नितीश पाथोडे म्हणतात...बाबुराव परसावार सिंदेवाहीइंग्रजी शिक्षणामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना अखेरची घरघर लागलेली आहे. अशातच एक सुखद बातमी कानावर आली. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या देशातील सर्वोच्च परीक्षेत विदर्भातील निवडक परीक्षार्थीमधून सिंदेवाहीचा नितीश हरिभाऊ पाथोडे यशस्वी झाला. त्यांच्याशी केलेली दिलखुलास बातचीत.नितीश पाथोडेला त्याच्या शिक्षणाविषयी विचारले असता, त्याने सांगितले, माझे इयत्ता चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सिंदेवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ (हेटी) येथे झाले. पाचवी ते दहावीपर्यंत सिंदेवाहीतील सर्वोदय विद्यालयात, ११ वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी आणि इलेक्ट्रानिक्स व टेलिकम्युनिकेशन मध्ये बी. टेक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणार जिल्हा रायगड येथून झाले, असे सांगितले.युपीएससी परीक्षेची निवड कशी केली, असे विचारला असता, भारतीय प्रशासनात जाण्याचा केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) हा एकमेव मार्ग आहे. माझे घरचे वातावरण शैक्षणिक आणि सामाजिक आहे. आई लीला व बाबा हरिभाऊ दोघेही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रीय कार्यकर्ते व बाबा विदर्भ संघटक आहेत. लहानपणापासून घरात चळवळ पाहिली. शिबिर, प्रशिक्षण, सभा, व्याख्याने नेहमीच होत असत. आपणही समाज कार्यात योगदान द्यावे, असे नेहमी वाटायचे. प्रशासकीय अधिकारी बनून जोमाने कार्य करता येईल असे वाटले आणि पदवीनंतर लगेच युपीएससीच्या तयारीला लागलो. या परीक्षेच्या तयारीबद्दल विचारले असता, अभ्यासाठी पुणे शहराची निवड केली. तेथील शैक्षणिक वातावरण चांगले आहे. मार्गदर्शनासाठी खासगी क्लॉसेस लावले. प्रा. तुकाराम जाधव आणि प्रा. अतुल लांडे यांची मला मदत झाली. ज्ञान प्रबोधिनीच्या अभ्यासिकेत प्रतिदिन १२ ते १४ तास अभ्यास करायचो. सन २०१२ पासून मी घरची दिवाळी पाहिली नाही. इतर अभ्यासातील सातत्य टिकविण्यासाठी मी आनंद व दु:खाच्या प्रसंगातही कधी सहभागी झालो नाही, असे सांगितले.परीक्षेसाठी कुटुंबाची मदत कशी झाली, याबाबत विचारले असता, ते म्हणाले माझ्या घरी आई, वडील व मोठी बहीण आहे. आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. उत्कृष्ट शिक्षक व शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सन २०१२ ला माझ्या वडिलांना तत्कालीन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे हस्ते राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यात आम्ही सर्व सहभागी होतो. मी दररोज रात्री ८ ते ९ च्या दरम्यान आई-वडिलांशी फोनवर किमान अर्धातास चर्चा करीत असतो. ती चर्चा कौटुंबिक नसून देशातील चालू घडामोडीवर असते. मी मुख्य परीक्षेसाठी मुंबईला होतो. तेव्हा माझी बहीण नीलम व भाऊजी पंकज लोहकरे यांनी सहकार्य केले, असे सांगितले. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल, असे विचारले असता, विद्यार्थी ग्रामीण असो की शहरी. शाळा मराठी असो की इंग्रजी, परिश्रम महत्त्वाचे आहे. एखादे ध्येय उराशी बाळगा. कोणतेही काम जिद्दीने करा. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणारा विद्यार्थी आयएएस बनू शकतो, हे लक्षात ठेवा आणि तयारीला लागा, असे आवाहन केले.
नोकरी नाही, सेवेसाठी निवड झाली
By admin | Updated: May 19, 2016 00:47 IST