आशिष देरकर - गडचांदूरभौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते. अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे संपूर्ण रस्ते व्यापलेले आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गडचांदूर शहराची रचना मुळात चुकीच्या पद्धतीने झाल्याने शहरात दोन मुख्य रस्ते आहेत. या दोन्ही मुख्य रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी बाजारपेठ आहेत. केवळ १५ फुटाचे दोन्ही रस्ते असल्यामुळे ग्राहकांना स्वत:चे वाहन उभे करण्याकरीता जागा उपलब्ध राहत नाही. अशावेळी ग्राहक रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. येथेच हातगाड्याही उभ्या केल्या जातात. त्याचा त्रास वर्दळ करणाऱ्या वाहनधारकांना होतो. या मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेने एकाचवेळी दुसरे चारचाकी वाहन आल्यास अनेकदा वाहतूक ठप्प होते. अशावेळी दुचाकी चालक कित्येकदा हॉर्न वाजवून मिळेल त्या गल्लीतून निघून जातात.गडचांदूर सिमेंंट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्त्व वाढविण्यात कारखान्यांचा मोठा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक येथे रोजगारासाठी वास्तव्यास असल्यामुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सिमेंटची वाहतूक करण्याकरीता गडचांदूर शहरात अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. कोणत्याही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. ज्या रस्त्यावर हे वाहन उभे असतात, तो सुद्धा गडचांदूर शहरात प्रवेश करण्याच्या मुख्य मार्ग आहे. रस्त्यावरील वाहनांनामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अवैध पार्किंगवर आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची पोलिसांमध्ये इच्छाशक्ती नसल्यामुळे ट्रान्सपोर्टवाल्यांची दादागिरी नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरुन शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे या ठिकाणी अनेक अपघात पण घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यंत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नगरपरिषद व पोलिसांनी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारुन अवैध पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण दूर होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
पार्किंगचा पत्ता नाही, हातगाड्यांचे अतिक्रमण
By admin | Updated: December 23, 2014 23:01 IST