शिक्षकांच्या पाच प्रलंबित समस्या : पुरोगामी समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीचंद्रपूर : २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेंशन योजना लागू ठेवावी, आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तर रोस्टर तयार करुन आंतर जिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, म.प.पा. शाळांमधील शिक्षकांचे १०० टक्के अनुदान हे स्वतंत्र शिक्षक वेतन असे खास लेखाशिर्ष टाकून अनुदान मिळावे, सन २०१५-१६ च्या आॅनलाईन संचमान्यतेतील त्रुटी दूर करून समायोजन प्रक्रिया तत्काळ सुरू करावीे या पाच प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्यावतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना उपजिल्हाधिकारी अजय रामटेके यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.एकीकडे वस्ती तिथे शाळा असे विधायक धोरण असताना आता २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा शासन बंद करीत आहे. यामुळे दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात. बालकांच्या व पालकांच्या संमतीशिवाय अशा शाळा शासनाला बंद करता येणार नाही. सदर शाळांचा खर्च शासनास परवडत नसेल तर अशा शाळांसाठी १० पटापर्यंत १ नियमित शिक्षक व ११ ते २० पटापर्यंत २ नियमित शिक्षक मंजूर करावे, अशी मागणी समितीने केली आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या राज्यकर्मचाऱ्यांशी सापत्न वागणूक करत शासनाने त्यांना पेंशनपासून वंचित ठेवले आहे. समान काम समान वेतन असे धोरण असतानाही धोरणाला फाटा देवून मनुष्यबळ विकासात अडचण आणल्या जात आहे. त्यामुळे सर्वांना जुनीच पेंशन योजना लागू असावी व यासह जुनीच सर्वसाधारण भविष्य निर्वाह योजनाही लागू करावी.आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतिक्षारत शिक्षकांचा तर शासन अंतच पाहत आहे. याचा परिणाम साहजिकन त्यांच्या कार्यक्षमतेवर दिसून येत आहे. विनाकारण तांत्रिक अडचणी निर्माण करून शिक्षण विभाग त्यांच्यावर मोठा अन्याय करीत आहे. जिल्हा रोस्टरच्या अटीतून सूट देत बदलीपात्र सर्व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय रोस्टर तयार करण्यात यावे व तत्काळ बदली प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे.मागील तीन वर्षांपासून शिक्षण विभागाची संचमान्यता रखडली आहे. त्यामुळे बदल्या, पदोन्नती, समायोजन, पदस्थापना पूर्णपणे बंद आहे. परिणामस्वरुप शिक्षक मानसिक मनस्ताप सहन करीत आहे. सन २०१३ पासून प्रलंबित असलेली संचमान्यता आजस्थितीला त्याच निकषावर मंजूर करणे अन्यायकारक होईल करीता जुनी सर्व प्रक्रिया रद्द करुन व सन २०१५-१६ च्या आॅनलाईन संचमान्यतेतील त्रुटी दूर करून रखडलेले समायोजन व अन्य समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात. या प्रमुख पाच मागण्यांसाठी पुरोगामी संघटनेच्यावतीने शनिवारीला ५ मार्चला राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व सरचिटणीस विजय भोगेकर यांच्या नेतृत्त्वात राज्यभर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदने देण्यात आली. निवेदनाच्या प्रति प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.चंद्रपूर येथील निवेदकांचे नेतृत्त्व दीपक वऱ्हेकर, हरिश ससनकर यांनी केले. यावेळी पुरोगामीचे जिल्हाभरातील पदाधिकारी दिलीप इटनकर, चंदा खांडरे, सुनीता इटनकर, प्रतिभा उदापुरे, दुष्यंत मत्ते, निखिल तांबोळी, बाळू गुंडमवार, सुधाकर कन्नाके, गजानन चिंचोलकर, देवराव दिवसे, विलास मोरे, रामकृष्ण चिडे, रवी बुरांडे, शंकर सोरते, गणेश दुधलकर, मनोज बुटले, श्रावण गुंडेटीवार, सिद्धम मौली, शंकरय्या हे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करु नये
By admin | Updated: March 8, 2016 00:48 IST