चंद्रपूर : अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मनमोहनसिंग सरकारने ३१ महिला खासदारांच्या संसदीय समितीचे गठन केले होते. या शिफारशींची अंमलबजावणी करा, या मागणीला घेऊन स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी अंगणवाडी महिल्यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मार्गदर्शनपर भाषणात संध्या बुटले म्हणाल्या, केंद्र शासनाच्यावतीने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींना तत्कालिन केंद्र सरकारने तसेच अच्छे दिन वाल्या मोदी सरकारने कचऱ्याची टोपली दाखविली आहे. अंगणवाडी सेविकांना महागाई भत्त्यासह किमान वेतन लागू करा, पेंशन, प्राव्हीडंट फंड योजनेचा लाभ द्या, अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. मात्र मोदी सरकारनेदेखील तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे. शोभा बोगावार यांनी देखील केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणावर सडकून टिका केली व अंगणवाडी महिलांचे शोषण बंद करा अशी मागणी लावून धरली. प्रा. दहीवडे म्हणाले, गरिबांचे नाव घेऊन पैसेवाल्याचे काम करणारे हे शासन आहे. सत्ता मिळविण्यासाठी त्यांना गरीब आठवतो. शेतमजुर तथा आदिवासीचा उल्लेख जाणिवपूर्वक केला जातो. मात्र निवडुन आल्यावर भांडवलदारांचे घर कसे भरता येईल याचीच चिंता यांना लागलेली असते, असे ते म्हणाले. वर्षा तिजारे यांनी आभार मानले. आंदोलनाच्या यशस्वीकरीता वामन बुटले, अजय किनेकर, विजय चौधरी, देवराव लोहकरे, शारदा लेनगुरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
अंगणवाडी महिलांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: March 2, 2015 01:10 IST