गडचांदूर :
कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांना निवेदन देण्यात आले.
गडचांदूर तालुका निर्मितीची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. यासाठी संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा आंदोलने केली. शासनानेसुद्धा याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. गडचांदूर तालुका निर्मितीला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार संघाने समर्थन दिले आहे. गडचांदूर हे शहर तालुक्याच्या दृष्टीने शासनाचे सर्व निकष पूर्ण करीत आहे. गडचांदूरपेक्षा अतिशय लहान शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. केवळ राजकीय पाठबळ नसल्याने तालुका निर्मितीला अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा शासनाने आता तरी गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीचे संघटक उद्धव पुरी, अशोककुमार उमरे, डॉ. के. आर. भोयर यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, नगरसेवक, गटनेते विक्रम येरणे, पापय्या पोन्नमवार, शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे उपस्थित होते.