चंद्रपूर : शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह अडते, व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांना सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. मात्र चंद्रपूर बाजार समितीला भेट दिली असता, बाजार समितीत कृषी मालाचा नाही तर ‘घाणीचा बाजार’ भरत असल्याचे दृष्य दिसून आले. येथील घाणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून क्षणभर थांबणेही कठीण जाते. येथील दुर्गंधीमुळे सारेच त्रस्त असून बाजार समिती प्रशासन मात्र नियमीत स्वच्छता केली जात असल्याचे सांगत आहे. गुरूवार दुपारी १ वाजताची वेळ, बाजार समितीत काहीसा शुकशुकाट होता. प्रवेशद्वारावरून आत प्रवेश करताच अतिशय खराब दुर्गंधीचा सामना करावा लागला. प्रवेशद्वारालगतच फळ व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. पावसामुळे खराब झालेले, सडलेले फळ बाजार समितीच्या अगदी प्रवेशद्वारालगत रस्त्याच्या कडेला ढीग टाकण्यात आले होते. या सडलेल्या फळांवर जनावरांचा हौदोस आणि माश्यांचा गोंगाठ दिसून आला. बाजार समितीच्या परिसरात फेरफटका मारला असता, स्वच्छतेबाबत कमालीची दुुर्लक्षता दिसून आली. धान, सोयाबीन, तूर आदी माल खरेदीसाठी असलेले बरेच गाळे आवकअभावी बंद अवस्थेत होते. या गाळ्यांसमोर व बाजार समितीच्या आवारात जनावरांची विष्ठा सर्वत्र पसरलेली होती. तर गाळ्यासमोरील नालीतही मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याचे दिसून आले. सब्जी मंडीतही हाच प्रकार निदर्शनास आला. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सडलेले माल टाकण्यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व अडते, विक्रेते हे मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात. फळांची विक्री होत असलेल्या गाळ्यांच्या लगतच बाजार समिती प्रशासनाने कचरा टाकण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे कोणीही कचरा टाकत नाही. मोकळ्याच जागेत कचरा टाकले जात असल्याने दुर्गंधीमुळे शेतकरी, व्यापारी, अडते सारेच त्रस्त आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)विकत घ्यावे लागते पाणीबाजार समिती परिसरात पाण्यासाठी जलकुुंभ उभारण्यात आले आहे. जलकुंभाद्वारेच बाजार समितीच्या नळांना पाणी पुरवठा होतो. मात्र या टाकींची स्वच्छता होत नसल्याने नळांना दूषित पाणी येते. त्यामुळे अनेक व्यापारी, अडत्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत असल्याचे एका फळ व्यापाऱ्याने सांगितले.बाजार समिती प्रशासनाकडून नियमित स्वच्छता केली जाते. मात्र पावसामुळे फळ, भाजीपाला सडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नियमीत स्वच्छता करूनही दुर्गंधी पूर्णपणे दूर होत नाही. कचरा साचलेल्या जागी स्वच्छता करून दुर्गंधी येऊ नये यासाठी ब्लिचिंग पावडर टाकले जात आहे. कचरा इतरत्र टाकला जाऊ नये, यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ‘त्या’ कचरा कुंडीत सध्या कचरा टाकले जात नाही. यासाठी लवकरच व्यवस्था करण्यात येणार असून पाण्याच्या टाकीची नियमीत स्वच्छता केली जाते. - संजय पावळे, सचिव, कृउबास चंद्रपूर.
बाजार समितीत ‘घाणीचा’ बाजार !
By admin | Updated: June 27, 2015 01:27 IST