सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील पंधराही तालुक्यामध्ये २६ मार्च रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या सन २०१५ ते २०२० या कालावधीकरीता होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुका लक्षात घेता बिगर अनुसुचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुकानिहाय व गावनिहाय निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक अधिनियम १९६४ च्या नियम २ अ (१) (२) नुसार पाच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि खुला व महिलांकरिताचा प्रवर्ग आरक्षित ठेवण्यात येणार आहे.शासन निर्णयान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील आरक्षण सोडत २६ मार्च रोजी काढण्याचा अध्यादेश जारी केलेला आहे. दुपारी २ वाजता तालुकास्तरावरील उपलब्ध सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने कार्यरत व इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावली येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सरपंचपदासाठी आरक्षण सोडत २६ मार्चला
By admin | Updated: March 14, 2015 01:02 IST