मुख्यमंत्र्यांकडे मागणी : सुभाष धोटेचंद्रपूर : जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे झाले आहे. शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. दुबार तिबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे बी- बियाणे नाहीत यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, मोफत बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना असलेले कर्ज माफझ करावे यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. सन २०१३ मध्ये संततधार पाऊस व महापुरामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले होते. त्यामध्ये खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. काही शेतकऱ्यांना अद्यापी शासनाची मदत सुद्धा मिळालेली नाही. अश्यातच जगाचा पोशिंंदा असलेल्या शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवली आहे. यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भात, इत्यादी हातच्या पीकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व संपूर्ण पीके हातून गेल्यात जमा आहेत. निसर्ग कोपला आहे. शेतकऱ्यांचे हाल केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. खरीप पीक करपून गेले. त्यामुळे शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. महागाईने होरपळलेल्या, कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांचे पावसाअभावी कंबरडेच मोडले आहे. अशा वेळी पावसाअभावी नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना निवेदन देवून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत, बँकेचे कर्जमाफ व मोफत बी-बियाणे देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: August 12, 2014 23:39 IST