बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ठरले आहे, त्यांच्यापुढे नाना अडचणी येत आहेत. सोबतच यजमानांनी आपल्या नातेवाईक, परिचित यांना निमंत्रित केले आहे; मात्र तेही लग्नाला यायचे की नाही, या प्रश्नाने ग्रासले आहेत. कारण ५० हून अधिक लोकांची उपस्थिती लग्नप्रसंगी नको, ही प्रशासकीय व्यवस्थेने घालून दिलेली अट आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दिवाळीपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले. सोबतच लग्न जोडणीला वेग आला. निमंत्रणाच्या चारशे-पाचशे पत्रिका बाहेरगावी पाठविल्या गेल्या. सोबतच गावातही वाटल्या. लग्न धुमधडाक्यात सतराशे- अठराशे लोकांच्या उपस्थितीत मस्तपैकी करू, याचा वर आणि वधू दोन्ही घरी आनंद ! त्यात कोरोनाचे परत विघ्न आले आणि सारेच गणित बिघडले. मंगल कार्यालय, कॅटरर्स यांना ॲडव्हान्स दिले. कपडे, सोने दागिन्यांची खरेदी झाली; पण जाचक नियमांनुसार ५० संख्येत लग्न कसे पार पाडायचे, ही चिंता साऱ्यांना सतावू लागली आहे. यजमानांसोबतच निमंत्रितही गोत्यात येत आहेत. आपण सहपरिवार लग्नात गेलो तर यजमान संकटात येणार, यामुळे निमंत्रितच फोनने यजमानांना 'आम्ही लग्नात यायचे काय?' अशी विचारणा करू लागले आहेत. त्यावर याचे उत्तर असते या ! पण एकटेच ! हे काल्पनिक नाही वास्तव आहे. अशी विचित्र स्थिती कोरोनाने आणली आहे.