चंदनखेडा : येथील कर्मवीर तांदूळ गिरणीलगत असलेल्या एका जनावराच्या गोठ्याला शनिवारी दुपारी २ वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. या आगीत शेतीची अवजारे, चारा जळून खाक झाला. सोबतच जनावरेही होरपळून निघाली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.राजेंद्र दादाजी भोयर यांचा गिरणीलगत बैलाचा गोठा आहे. आगीमुळे त्यांचे जवळपास एक लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी तथा वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असला तरी नेमके कारण कळू शकले नाही. भाजलेल्या दोन बैल व वासरावर पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे ऐन हंगामात संबंधित शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढे शेतीचा हंगाम, चारा तसेच इतर गोष्टीची जुळवाजुळव शक्य नसल्याने शासनाने या शेतकरी आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी गावकरी वर्गाकडून केली जात आहे. (वार्ताहर)
आगीत लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 00:52 IST