सुधीर मुनगंटीवार : १७८ कोटी रुपयांच्या थकीत मानधनाची तरतूद हिवाळी अधिवेशनात करणार चंद्रपूर : औरंगाबादच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आयएसओ प्रमाणित आदर्श अंगणवाड्या निर्माण करण्यात येणार असून अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनाच्या थकबाकीच्या १७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद येत्या हिवाळी अधिवेशनात निश्चितपणे करण्याचे आश्वासन वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेतर्फे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शनिवारी आयोजित अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलतांना दिले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर होते, तर मंचावर आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, महिला बालकल्याण समितीच्या सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या बाल आकार-२०१५ या पुस्तकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.शून्य ते सहा वयोगटातील सर्व मुले कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांची असल्याने त्यांना घडविण्याचे मोठे राष्ट्रीय कार्य तुमच्या हाती आहे. या मुलांना गुणवान करा, ही लहान मुले देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे आपण सेवा भावनेने कार्य करावे, असे आवाहन ना.मुनंगटीवार यांनी यावेळी केले. या बालवाडीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर पुरुष होऊ शकतात. अशा लहान मुलामध्ये चांगले विचार व संस्कार घडविण्याचे महान कार्य तुमचे असल्याने ही जबाबदारी आपण ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील जिवती, पोंभुर्णा व मूल या तालुक्यातील ३२५ अंगणवाडया एका वर्षात उत्तम दर्जाच्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडयांचा कायापालट करुन त्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षस्थानावरुन बोलताना ना.हंसराज अहीर म्हणाले, ज्या गावात आपण सेवेच कार्य करीत आहात, त्याचे मुल्यांकन कोणीच करु शकत नाही. ग्रामीण भागातील गरीब मुलांना शारीरिक, मानसिकरीत्या सुदृढ करण्याचे काम आपण करीत आहात. या मुलांना चांगला सकस आहार देण्यासाठी केंद्र सकारकडून काही आर्थिक सहकार्य हवे असल्यास तसे चंद्रपूर जिल्ह्यात प्रोजेक्ट तयार करण्यात यावे, असेही ते म्हणाले.आ. शामकुळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविकेचे हे पद लहान असले तरी ते राष्ट्रीय कार्य असल्याने आपले काम महान आहे, असे ते म्हणाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर, महिला व बाल कल्याण सभापती सरिता कुडे व बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनीही या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. या कार्यशाळेला जिल्हयातील अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठया संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
औरंगाबादच्या धर्तीवर जिल्ह्यात अंगणवाड्या निर्माण करणार
By admin | Updated: October 18, 2015 00:57 IST