देवाडा परिसर : तक्रार करूनही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविषयी रोष व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे, भारनियमनच्या नावाखाली वीज पुवठा खंडीत करणे, यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसांपासुन कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा खंडीत असतो. चुकून एखादे वेळी वीज पुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडीत होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात विघाड होत आहे.पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने पीठ गिरणी बंद राहते, त्यामुळे महिला वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. घरची कामे मजुरी व शेतीची कामे सोडून धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरणीवर चकरा माराव्या लागतात तसेच आजच्या काळात सर्व दाखले हे आॅनलाईन पद्धतीने मिळतात. मात्र वीज पुरवठा खंडीत राहत असल्याने प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. ३३ के.व्ही सबस्टेशनची मागणी देवाडासह परिसरातील विद्युतधारकांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेता, येथे ३३ केव्ही सबस्टेशन देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासनाची खैरात करणारेही निवडणूक झाल्याबरोबर आश्वासन विसरले. देवाडासारख्या मोठ्या गावात सहायक अभियंता कार्यालय सुरू करावे. जेनेकरून स्थानिक पातळीवर समस्या सोडविता येतील. वीज उपकरणे धोक्यात वेळी अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्र ीज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर कॉम्युटर मध्ये विघाड येत आहे. महावितणच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त
By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST