वरोरा : वडीलांशी भांडण झाल्याने संतप्त होत वडिलांचाच मुलाने खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मामाने मदत केली. या प्रकरणात वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास आजीवन सश्रम कारावासाची तर मामास मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुरसा गावात बालाजी मंदे राहत होते. बालाजीचा मुलगा अनिल याचे आपल्या वडीलासोबत पटत नव्हते. १० मे २०१३ रोजी मुरसा गावात शंकर गाडगे यांच्या मुलीचा विवाह होता. या विवाहात बालाजी व त्यांचा मुलगा अनिल यांचे भांडण झाले. त्यानंतर अनिलने बालाजींना घरी नेले व घरातील वजनदार लोखंडी बत्त्याने बालाजींच्या डोक्यावर वार केले. यात बालाजींचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बालाजीचा मृतदेह चादरीत गुंडाळून अनिल व त्याचा मामा मोहन चिडे या दोघांनी बैलबंडीने मुरसा गावाजवळील तीन किमी अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर टाकून घरी परत आले. भद्रावती पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता हत्या झाल्याचा संशय व्यक्त करीत तपास सुरु केला. अनिलला ताब्यात घेतले असता त्याने हत्येची कबुली देत बालाजीला ठार करण्यात वापरलेले हत्यार, चादर पोलिसांच्या स्वाधीन केली. यासाठी मदत करणारा मामा मोहन चिडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेवून दोषारोपपत्र वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी १४ साक्षदारांची तपासणी केली. जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी अनिल मंदे यास आजीवन तर मोहन चिडे याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)
वडिलांचा खून करणाऱ्या मुलास आजीवन कारावास
By admin | Updated: December 10, 2014 22:54 IST